वयात आल्यावर मुली आटोपशीर शरीराच्या असतात. फुलपाखराची स्थिती साधारण 24 ते 25 वयापर्यंत टिकते. लग्न होते आणि मग लठ्ठपणाकडे प्रवास सुरू होतो. लग्न ठरल्याबरोबर सायकल मारणे, व्यायाम करणे बंद होते. लग्न होते. त्यानंतर सुस्तपणाही वाढतो. मग शरीराकडे बघणार कोण? असे प्रश्न येऊ लागतात.
दिवस गेल्यावर डोहाळे लागतात. सारखेच खावेसे वाटते. शरीराकडे आणखी दुर्लक्ष होते. प्रसृती नंतर “ओली बाळतीण’ म्हणून हालचाल अजिबात करू दिली जात नाही. डिंकाचे लाडू, तूप असा खुराक चालू होतो. नंतर मग मुलांची शाळा, डबा चालू होतो. सगळा सांभाळताना आणखी हालचाल कमी होते. सर्वांत शेवटी जेवणाची सवय असेल, तर स्वयंपाक उरतो म्हणून अती खाण्यात येते. दूपारी वेळ मिळतो.
झोप, गप्पा, खरेदी, टी. व्ही. यात जातो. शरीराकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ मिळत नाही. शिवाय चविष्ट लागणारे बाजारातील जंक फूड-फास्टफुड संतुलित आहाराची जागा घेतात. व्यायाम करायला वेळेच मिळत नाही, वेळ मिळाला तर एवढा थकवा आलेला असतो, की व्यायाम करण्याची इच्छा राहत नाही आणि वजन दिवसेंदिवस वाढू लागते.
सहसा आरश्यात बघितल्यावर कल्पना येते की पोट जरा जास्तच सुटलेले आहे. कित्येक वेळा “तब्येत बरीच सुधारलीय तुमची” असे गोड शब्दात सांगून आपण जाड होत आहोत, हे सांगून जातात. मग म्हणता म्हणता चाळीशी येते. पाळी बंद व्हायची वेळ येते. मधूमेह, रक्तदाब, सांधेदुखी, पोटदुखी, असे आजार मागे लागतात. त्यामुळे अजून नैराश्य येऊ लागते. त्यासाठी संतुलित आहार व व्यायाम केले पाहिजे. गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत!
डॉ आदिती पानसंबळ
आहारतज्ज्ञ, नगर.संपर्क : 7385728886