नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासीयांशी ‘मन की बात’ मधून संवाद साधला. देशात करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती, स्थलांतरित मजूर यासह अनेक मुद्द्यांवर पंतप्रधानांनी यावेळी भाष्य केले. करोनाविरोधातील लढाई देशाने गंभीरतेने लढली आहे. अजूनही आपल्याला हे पालन करत राहावे लागणार आहे. आपल्या माणसाठी, आपल्या देशासाठी आपल्याला आता सतर्क राहावे लागणार आहे, असे आवाहन मोदी यांनी देशवासियांना केले.
करोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला.
देशात सर्व नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून कोरनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील करोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगाने फैलाव हाऊ शकला नाही. करोनामुळे होणारा मृत्यू दर देखील आपल्या देशात खूपच कमी आहे. मात्र, आपले जे नुकसान झालं आहे त्याचे आपल्या सर्वांनाच दुःख आहे. मात्र, जे काही आपण वाचवू शकलो. ते निश्चितपणे देशाच्या सामुहिक संकल्पशक्तीचाच परिणाम असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
आपल्या देशातही एकही असा वर्ग नाही जो सध्या कठीण परिस्थितीचा सामना करीत नाही, अडचणीत नाही. या करोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो आपली गरीब जनता, कामगार, श्रमिक वर्गाला बसला आहे. त्यांची अडचण, त्यांचे दुःख, यातना या शब्दांत सांगतल्या जाऊ शकत नाहीत, अशा शब्दांत पंतप्रधानांनी लॉकडाउनमुळे सुरु असलेल्या देशातील आजवरच्या सर्वांत मोठ्या स्थालांतरावर भाष्य केले.