मुंबई – राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. मात्र, चक्रीवादळाने मान्सुनची तीव्रता कमी झाल्याने पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकरी वर्गासमोर चिंतेचे वातावरण आहे. सोबतच विदर्भात अजुनही उष्णतेची लाट बघायला मिळत आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनण्याची भीती आहे.
मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आल्याचे चित्र आहे. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला असून खरीपाच्या पेरण्या देखील झालेल्या नाहीत. धूळवाफ पेरण्या झालेल्या ठिकाणी आता पुन्हा एकदा दुबार पेरणीचे सावट निर्माण झाले आहे.
राज्यात दरवर्षी जवळपास 150 लाख हेक्टरवर पेरण्या होतात. यंदा मात्र 18 जूनपर्यंत फक्त 1 लाख हेक्टरवर लागवड झाली आहे. दरवर्षी तळकोकणात पाऊसाची सुरुवात चांगली होते, पण यंदा तळकोकणातही पाऊस हवा तसा अद्यापही सक्रिय नाही. राज्यात 23 जुलैनंतरच चांगल्या पावसाची शक्यता आहे. पाऊस अधिक लांबल्यास कडधान्याच्या पेरणी क्षेत्रात घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पश्चिम महाराष्ट्रात अद्याप पेरण्यांना सुरुवात देखील झालेली नाही. वळीव पाऊसही न झाल्यामुळे उन्हाळी मशागतीही रखडल्या. कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांची पाणी पातळी खालावल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याचं चित्र आहे.
विदर्भात कपाशी, सोयाबीन, भुईमूगसारखी पिकं मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. साधारण जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणीला सुरुवात होत असते. मात्र, अद्यापही पेरण्यांना सुरुवात झालेली नाही. नागपूर आणि अमरावती विभाग मिळून 50 लाख हेक्टरची लागवड खरीपमध्ये होते. मात्र, फक्त आतापर्यंत तीन ते चार टक्के लागवड झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मान्सून लांबण्याची कारणे चक्रीवादळ आहे. राज्यात मान्सून दाखल झाला होता. परंतु चक्रीवादळाने तीव्रता कमी झाली. चक्रीवादळ पूर्ण शांत झाल्यावर 24 जूनला राज्यात मान्सुन सक्रिय होईल. या मान्सुनचा जोर 15 जुलैपर्यंत कायम राहिल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.