मुंबई – उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राशी गद्दारी केली.. खुर्चीकरता ठाकरेंनी महाराष्ट्रात सौदा केला.. ते खरे गद्दार आहेत अशी घणाघाती टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. आज कल्याणमध्ये भाजपचा मेळावा पार पडला. याच मेळाव्यात बोलताना फडणवीस यांनीं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ठाकरेंचं कालच भाषण म्हणजे ओकारी अशा शब्दात यावेळी फडणवीसांनी जोरदार टोलेबाजी केली.
आज शिवसेनेचा वर्धापन दिन त्यानिमित्त मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा असे दोन कार्यक्रम पार पडताहेत. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन पार पडताहेत. यावरून देखील फडणवीस यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. एक वर्धापन दिन ज्यांनी शिवसेना वाचवली त्यांचा चाललंय तर दुसरा वर्धापन दिन ज्यांनी शिवसेना बुडवली त्यांचा चाललंय अशी टोलेबाजी फडणवीस यांनी यावेळी केली.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेला शुभेच्छा देत फडणवीसांनी यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात केली. उद्धव ठाकरेंबाबत बोलताना फडणवीस म्हणाले,”भाजप आणि शिवसेनेच्या युतीला पूर्ण बहुमत महाराष्ट्राच्या जनतेनं दिल होत. उद्धव ठाकरे तुम्ही गद्दारी केली.. केवळ खुर्ची करता तुम्ही गद्दारी केली त्यामुळे खरे गद्दार तुम्ही आहात. भाजपसोबत तुम्ही मोदींचे फोटो लावून मत मागितली आणि निवडणुकीनंतर गद्दारी केली त्यामुळे तुम्हाला इतरांना गद्दार म्हणण्याचा अधिकार नाही. असंही फडणवीस यावेळी म्हणाले.