नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (ncp) बंड करून सत्तेत सहभागी झालेल्या अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर कारवाई करण्यासाठी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सोमवारी (9 ऑक्टोबर) सुनावणी होणार असून, दोन्ही गट या सुनावणी दरम्यान या काय युक्तीवाद करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
2 जुलै रोजी अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह राष्ट्रवादीत बंड करून सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. यानंतर आपण कोर्टात नाही तर जनतेत जाणार असे म्हणणाऱ्या शरद पवार (Sharad pawar) गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात अजित पवार गटातील आमदारांवर कारवाई करण्यात यावी, यासाठी याचिका दाखल केली आहे. यामध्ये अजित पवार गटातील 41 आमदार अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. (ncp Split)
यानंतर अजित पवार गटाकडूनही सर्वोच्च न्यायालयात “कॅव्हेट’ दाखल करण्यात आली आहे. तसेच आमचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.शरद पवार गटाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नमुद आहे की, पक्षाच्या विरोधात जाऊन 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. पक्षाची मान्यता नसताना मंत्रीपदाची शपथ घेण्यात आली आहे. त्यामुळे या मंत्र्यांवर कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये केशम सिंग (मणिपूर) आणि राजेंद्र सिंह राणा खटल्याचाही संदर्भ देण्यात आला आहे.
निवडणूक आयोगातही सुनावणी
शरद पवारांकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात 11 वाजता सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर होणार आहे. सोबतच केंद्रीय निवडणूक आयोगात पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी सुरू झाली असून, पहिली फेरी पार पडली आहे. आता उद्या, सोमवारी होणाऱ्या सुनावणीत निवडणूक आयोग कोणता निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.