मुंबई – पुणेकरांसाठी पीएमपी बससेवेसह रिक्षा हे महत्त्वाचे प्रवासी साधन आहे. ओला, उबेर रिक्षांप्रमाणे सीटर रिक्षांचा वापर पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावर होतो. शहरातील रिक्षा संदर्भात आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षांसाठी हा “पायलट प्रोजेक्ट’ असणार आहे. त्याच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर हा प्रयोग संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. सरकार या दोन्ही शहरांत ई-रिक्षा सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे या शहरांतील प्रदूषणही कमी होण्यास मदत होईल. शहरांमध्ये वाढलेले हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी ई-रिक्षा हा महत्त्वाचा प्रोजक्ट सुरू होणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरामध्ये राबविण्यात येणार आहे. ज्या रिक्षांची नोंदणी होईल, त्या रिक्षांना ई-रिक्षा किंवा अटीनुसार नव्याने ई-रिक्षा देण्याचे शासनाचे धोरण असेल, याबाबतची प्राथमिक तयारी पूर्ण झाली आहे.
राज्यांतील शहरांची प्रदूषण पातळी वाढत असल्याने शासनाने प्रदूषण नियंत्रणाबरोबरच स्वस्तात नागरिकांना प्रवास देण्याकरिता ई-बसच्या पार्श्वभूमीवर ई-रिक्षा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेणयात आला आहे. या पायलट प्रोजेक्टसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ठाणे शहराची निवड करण्यात आली आहे. ई-रिक्षाच्या प्रोजेक्टची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातून होणार आहे. सरकारचे ई-रिक्षाचे हे धोरण अंतिम टप्यात आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांसह रिक्षा चालकांनाही होणार आहे.
चार्जिंग नव्हे तर बॅटरी स्टेशन…
ठाणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये जितक्या रिक्षांची नोंदणी झाली आहे, त्या रिक्षांच्या बदल्यात सरकारतर्फे ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत. या ई-रिक्षासाठी चार्जिंग पाईंटचा विषय नसणार आहे. सरकारकडून या रिक्षांसाठी बॅटरी स्टेशनची व्यवस्था केली जाणार आहे. या ठिकाणी रिक्षाचालकांना बॅटरी संपल्यानंतर संपलेली बॅटरी देऊन त्या बदल्यात चार्ज केलेली दुसरी बॅटरी दिली जाणार आहे. यामुळे रिक्षा चालकांचा चार्जिंग करतानाचा वेळ वाचणार आहे.