मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षातील आमदारांची साथीला घेत शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी होतं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी अजित पवार यांना राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.
आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे- पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, संजय बाबूराव बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांचा समावेश आहे. मागील वर्षी झालेल्या शिवसेना पक्षातील बंड झाल्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, दिवसभरातील या राजकीय परिस्थितीवर अनेक नेते मंडळींसह मराठी कलाकारही प्रतिक्रिया देत आहेत.
अश्यातच, मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने ट्विट करत भावना व्यक्त केली आहे. तेजस्विनीने दोन ट्विट केले असून, सध्या तिचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. पहिल्या ट्विटमध्ये तिने म्हंटलं आहे “भेळ हवीये भेळ? सर्वोत्तम भेळ आमच्या महाराष्ट्रात मिळेल…’ असं ट्विट तेजस्विनी पंडितने केलं आहे. तिच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
तर आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख केल्याचं दिसून आलं आहे. “तत्वनिष्ठ, सार्वभौम विचार आणि महाराष्ट्रावर अपार प्रेम अशाच माणसाने आता महाराष्ट्रावर ‘राज’ करावं. – महाराष्ट्राचा भरडलेला नागरिक” असं तेजस्विनीने ट्वीटमध्ये म्हटलंय. यासोबतच तिने ‘महाराष्ट्र आता तरी जागा हो’ असा हॅशटॅग दिला आहे.