मुंबई – विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह आठ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री होत अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यामुळे महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राजकीय वर्तुळातून आता याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत या राजकीय घडामोडीवर भाष्य केले आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये आदित्य ठाकरे म्हणतात,”मंत्रिमंडळ विस्तार झाला.आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं ? रायगड असो, नाशिक असो, जळगाव असो.. जे गद्दार स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांचा त्रास होतोय असं सांगत होते,आता राष्ट्रवादीच्या त्याच नेत्यांना मंत्रीपदं मिळाल्यावर ह्यांचं काय होणार? आता पुन्हा गुवाहाटी? असे प्रश्न यावेळी आदित्य ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.
आदित्य ठाकरे पुढे म्हणतात,”एक गद्दार आज टीव्हीवर म्हणाले, १४५ जागा जिंकायच्या असतील तर ह्यांना सोबत घ्या”, असं वरिष्ठांनी सांगितलं. म्हणजे हे सिद्ध झालंय की मिंधेंकडे क्षमताच नाही ! नाहीतर एवढं गद्दारांचं बहुमत असताना आजचा कार्यक्रम कशाला ? आणि सर्वात महत्वाचं.. आम्ही कॉंग्रेस आणि NCP सोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडलं, असं म्हटलं गेलं मग आज भाजपाने काय केलं ? तेही सत्तेसाठी आकड्यांची गरज नसताना ! एक सिद्ध झालं, तुमच्या गद्दारीमागे फक्त आणि फक्त स्वार्थ आहे ! ‘स्वार्थी विरुद्ध स्वाभिमानी’,अशी ही लढाई असणार आहे.
आजच्या राजकारणातल्या गलिच्छ परिस्थितीवर भाष्य न करता काही महत्वाचे प्रश्न –
मंत्रिमंडळ विस्तार झाला. आधीच फेल झालेल्या डबल इंजिनाला अजून एक चाक लागलं. चला, पण ज्या गद्दारांना मंत्रीपदाची स्वप्नं पडत होती, त्यांना १ वर्ष उलटल्यावरही काय मिळालं??
रायगड असो, नाशिक असो, जळगाव…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 2, 2023
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थमंत्री पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार देखील आता उपमुख्यमंत्री बनले आहे. अजित पवार हे पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहे. यामुळे महाराष्ट्राला पहिल्यांदाच दोन उपमुख्यमंत्री लाभले आहेत.