– राहूल गोखले
कॉंग्रेसच्या निर्णयाने महिला पक्षाकडे उमेदवारी मागतील; पण त्या जिंकून याव्यात यासाठी कॉंग्रेसकडे नेतृत्व आणि संघटन हवे. उत्तर प्रदेशात कॉंग्रेसला हीच पोकळी भोवणार यात शंका नाही.
लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षण द्यावे यासाठीचे विधेयक गेली पंचवीस वर्षे संसदेत संमत होण्याची प्रतीक्षा करीत आहे. पहिल्या लोकसभेत महिला खासदारांची संख्या 24 होती; विद्यमान लोकसभेत ती 78 आहे. तरीही हे प्रमाण 15 टक्क्यांहून कमीच आहे. तेव्हा विधेयकात प्रस्तावित आरक्षणाच्या हे प्रमाण निम्मे आहे. पण विधेयक पारित झाले नाही म्हणून राजकीय पक्षांना महिलांना अधिक प्रतिनिधित्व उमेदवारीत देण्यापासून कोणीही रोखलेले नाही.
तथापि राजकीय पक्षांची तशी मानसिकता नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे आणि कोणताच पक्ष त्यास अपवाद नाही. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात कॉंग्रेसने स्वतःहून 40 टक्के जागांवर महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे याचे स्वागत करावयास हवे. अन्य पक्ष आता महिलांना किती प्रमाणात उमेदवारी देतात यावर सर्वांचे लक्ष असेल. कॉंग्रेसने उचललेले पाऊल ही जमेची बाजू असली तरी ती एकमेव बाजू नाही आणि म्हणून कॉंग्रेसच्या या निर्णयाची दखल अधिक खोलात जाऊन घेणे आवश्यक.
उत्तर प्रदेशात प्रियंका गांधी यांनी त्या राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस 40 टक्के जागांवर महिला उमेदवार रिंगणात उतरवेल अशी घोषणा केली आहे. त्या स्वतः उमेदवार असणार का याविषयी स्पष्टता नाही; पण निवडणुकीच्या वातावरणात त्यांची घोषणा लक्षवेधी ठरली आहे यात शंका नाही. हा निर्णय घेतल्यानंतर महिलांना पक्षाकडे उमेदवारी मागण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा म्हणून हे अर्ज करण्याची मुदतही वाढविण्यात आली आहे.
यातील पहिला भाग असा की, निवडणुकीत महिला की पुरुष याबरोबरच जो तितकाच महत्त्वाचा निकष असतो तो म्हणजे जिंकून येण्याची क्षमता. अन्य पक्ष किंवा कॉंग्रेसही अल्प प्रमाणात का होईना जेथे महिलांना उमेदवारी देतात तेव्हा उमेदवार महिला आहे यापेक्षाही तिच्यात जिंकून येण्याची क्षमता आहे हा निकष वरचढ असतो. तेव्हा अचानक 40 टक्के जागांवर कॉंग्रेसला जिंकून येण्याची क्षमता असणाऱ्या महिला उमेदवार म्हणून मिळणार का, हा प्रश्न आहे.
त्यातच उत्तर प्रदेशात कॉंग्रेसची स्थिती आताच नव्हे तर वर्षानुवर्षे दयनीय झाली आहे. एके काळी उत्तर प्रदेशात कॉंग्रेस हा सत्ताधारी पक्ष होता; पण 1967 साली संयुक्त विधान दलाच्या प्रयोगात कॉंग्रेसला सत्ताच्यूत व्हावे लागले आणि त्यानंतर अपवाद वगळता कॉंग्रेसची घसरगुंडीच होत राहिली आहे. पहिल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 388 जागा जिंकता आल्या होत्या. विद्यमान विधानसभेत कॉंग्रेसचे अवघे सात आमदार आहेत.
समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष या पक्षांपाशी भाजपला टक्कर देण्याची कॉंग्रेसच्या तुलनेत जास्त ताकद आहे. जितीन प्रसाद यांच्यासारखे नेते कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपच्या तंबूत शिरले आहेत. तेव्हा कॉंग्रेसचे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काय स्थान राहणार हे स्पष्ट असताना 40 टक्के जागांवर महिलांना उमेदवारी देऊन कॉंग्रेस नक्की काय साधणार हे कळू शकत नाही.
शेतकरी आंदोलन, लखीमपूर येथील हिंसाचार, महिलांवरील हल्ले हे मुद्दे ज्वलंत ठेवण्यासाठी प्रियंका गांधी यांनी सक्रियता दाखविली खरी; पण म्हणून कॉंग्रेसला उत्तर प्रदेशात सत्तेचा मार्ग सोपा होईल असे, मानणे भाबडेपणाचे ठरेल. कारण केवळ निवडणुकीच्या तोंडावरची सक्रियता कामी येत नाही. त्यातच अशीही शंका उपस्थित होत आहे की, कॉंग्रेसच्या या निर्णयामुळे इच्छूक पुरुष उमेदवार आपल्याच कुटुंबातील महिलांची नावे पुढे रेटणार नाहीत याची खात्री काय?
अन्यत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महिलांसाठी मतदारसंघ आरक्षित झाला की हे चित्र सर्रास दिसते. कॉंग्रेसच्या या निर्णयाने त्याचीच पुनरावृत्ती झाली तर निर्णयामागच्या हेतूला हरताळ फासला जाण्याची शक्यता अधिक आणि वेगळ्या घराणेशाहीला निमंत्रण मिळण्याचा संभव जास्त.
तेव्हा प्रियंका गांधी यांनी महिलांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी कॉंग्रेसतर्फे देण्यात येईल ही घोषणा केली एवढ्यानेच केवळ काहीही साध्य होणार नाही. या उमेदवारांमुळे घराणेशाहीला उत्तेजन मिळत नाही ना हेही पाहणे आवश्यक आणि त्यापेक्षाही त्या महिला उमेदवार जिंकून याव्यात म्हणून व्यूहनीती काय आखावी लागेल,
संघटनेत चैतन्य कसे भरता येईल याची पक्षाने चिंता करणे गरजेचे. महिला उमेदवार विधिमंडळात पोचल्या नाहीत तर निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढावा हा खरा उद्देश पराभूत होऊन केवळ महिलांना उमेदवारी दिली एवढ्यावर समाधान मानावे लागेल.
अशा घोषणांची आकर्षकता वरकरणी मोठी वाटली तरी कॉंग्रेस उत्तर प्रदेशात ज्या स्थितीत आहे त्यावरून हे आवतण पराभूत पक्षाचे नाही ना अशी शंका इच्छूक महिला उमेदवारांना येऊ शकते आणि तसे झाले तर प्रियंका गांधी यांच्या घोषणेला प्रतिकात्मकतेचे स्वरूप येऊ शकते. प्रतिकात्मकता कितीही आकर्षक वाटली तरी तिला आशयघनतेचे गांभीर्य येऊ शकत नाही.