पुणे – करोनाच्या प्रादुर्भावामुळे दीड वर्षे बंद असलेल्या शाळा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. पण, आता शाळांना गुरुवारपासून 14 दिवसांची दिवाळीच्या सुट्या अचानक जाहीर करण्यात आल्या आहेत. दिवाळी सुट्यांच्या वेळापत्रकात बदल केल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यात गोंधळ निर्माण झाला आहे.
राज्यात मार्च 2020 पासून करोनाचा प्रादुर्भाव निर्माण झाला होता. यामुळे सतत लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी असे निर्बंध घालण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देत शाळाही बंदच ठेवण्यात आल्या होत्या. ऑनर्लान वर्ग सुरु ठेवण्यालाच प्राधान्य देण्यात आले होते.
सन 2021-22 या शैक्षणिक वर्षालाही 15 जूनपासून सुरुवात करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात शाळा उघडण्यात आल्याच नव्हत्या. इयत्ता पहिली ते बारावीच्या शाळांना विविध धार्मिक सण, उत्सवासाठी सुट्या घोषित केल्या जातात. त्याअंतर्गत दिवाळी सणाच्या अनुषंगाने शाळांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या कालावधीत शाळांचे कामकाज बंद राहणार आहे. याबाबतचे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव राजेंद्र पवार यांनी जारी केले आहेत.
करोनाचे संकट आटोक्यात आल्यानंतर टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमुळे शाळा पुन्हा गजबजल्या होत्या. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षाही सध्या सुरू झालेल्या आहेत. शिक्षण संचालकांनी शैक्षणिक वर्षाचे सुट्टयांचे कॅलेंडर जूनमध्येच जाहीर केले होते. त्यानुसार 1 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत दिवाळीची सुट्टी दर्शविण्यात आली होती. मात्र, आता शासनाने दिवाळी सुट्टयांचे वेळापत्रकच बदलले आहे. यामुळे शासनाने अचानक दिवाळी सुट्टी जाहीर केल्यामुळे शाळास्तरावर सर्वांचीच गोंधळासारखी मनस्थिती निर्माण झालेली आहे.
शिक्षणमंत्र्यांना निवेदन
दिवाळी सुट्याचे वेळापत्रक बदलल्यामुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडणार आहे. त्याचा परिणाम शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्वच घटकांच्या मानसिकतेवर होणार आहे. संपादणूक चाचणी संदर्भात 20 नोव्हेंबरनंतर आयोजन करण्याबाबतचे नियोजन करावे. तसेच शासनाने बुधवारी काढलेले सुट्टयांचे आदेश रद्द करावेत व पूर्वी जाहीर झाल्याप्रमाणे दिवाळी सुट्टया द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.