– हेमंत महाजन
चीन गेले कित्येक वर्षे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या भारतीयांना आपल्या बाजूने वळण्याचा प्रयत्न करत आहे. चीन भारतीय प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच सोशल मीडियामधील अनेकांना आपल्या बाजूने आणून चीनविषयी चांगले वातावरण निर्माण करतो आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने चीन कोणाला आपल्या बाजूने आणायचे आहे, ते ठरवतो.
राजधानी दिल्लीमध्ये अनेक विचार मंच आहेत. चीनसारखा विचार करणाऱ्या रिसर्च स्कॉलर्सना, पॉलिसी एक्सपर्टना चीनमध्ये स्कॉलरशिप देऊन पाठवले जाते. त्यांना दाखवले जाते की, भारत आणि चीनच्या लोकांमधले संबंध वाढवावे. खरा उद्देश असतो की, भारतीयांनी फक्त चीनसारखे वागावे, चीनच्या बाजूने वागावे, चीन जसे सांगेल तसे वागावे. दिल्लीमधील चिनी वकिलात,
अनेक विचार मंच आणि विचारवंतांच्या संपर्कात असते. काही विचारमंच दाखवतात की, ते अतिशय न्यूट्रल आहेत आणि कुठल्याही विषयावरती आपले स्वतंत्र मत मांडतात. पण खरंतर ते चीनची भाषा बोलतात. चीनसारखा विचार करणारे काही नोकरशहा आपल्या सरकारला चीनच्या सोयीस्कर असा सल्ला देतात.
चिनी एक्सपर्टना भारतीय विद्यापीठांकडे पाठवले जाते आणि काही वेळा त्या विद्यापीठातल्या काही चिनी समर्थक प्रोफेसरांना चीनला बोलावले जाते. भारतामध्ये आज अनेक प्रायव्हेट इंडस्ट्रीने सुरू केलेली विद्यापीठे आहेत. त्यामधील काही वर चीनचा प्रभाव आहे. काही विचार मंच चीनच्या बाजूने कार्यक्रम करत असल्याचे दिसते. काही विद्यार्थ्यांनासुद्धा याचे शिकार बनवले जाते.
चीनचे 2500 मिलिटरी सायंटिस्ट वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेले आहेत. ते देशाच्या युनिव्हर्सिटी चिनी कार्यक्रम चालवतात. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, बिग डेटा या सगळ्यांचा वापर करून एक डेटा तयार केला आहे ज्यामध्ये जे प्रोफेसर, विचारवंत, नोकरशहा आणि इतर जे चीनच्या बाजूने येऊ शकतील त्यांची एक लिस्ट आहे आणि त्यांना नंतर चिनी प्रचाराचा बळी बनवला जातो.