नव्या पिढीवर केवळ घराण्याची जादू चालणार नाही. नवे मुद्दे घेऊन, तरुणांना आकर्षित करून घेऊनच कॉंग्रेसला भाजपशी टक्कर देता येईल.
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी, “मीच पक्षाची पूर्णवेळ अध्यक्ष आहे आणि काही मतभेद असले, तर थेट माझ्याशी संवाद साधावा. प्रसारमाध्यमांशी नव्हे’, अशी ताकीद देऊन, बंडखोरांना चूप केले आहे. कॉंग्रेसच्या पक्षांतर्गत बैठकाच होत नसल्यामुळे आम्हाला आमची मते मांडायला वावच नाही. पक्षश्रेष्ठी भेटीची वेळ देत नाहीत. त्यामुळे माध्यामांसमोर जाण्याखेरीज दुसरा उपायच नाही, असे उद्गार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी नुकतेच काढले होते.
एवढेच नव्हे, तर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पक्षांच्या नेत्यांना भोजनासाठी घरी आमंत्रित केले होते आणि त्यात लालूप्रसाद यादव यांचाही समावेश होता. बिहार विधानसभा निवडणुकांनंतर लालूंचे राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस यांच्यात मतभेद निर्माण झाले आहेत, पंजाबात प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंग सिद्धू यांची निवड झाली आणि त्यांच्या दोन सल्लागारांनी पाकिस्तान व काश्मीरबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली. त्याबाबत कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी जाहीर मतप्रदर्शन करून, सिद्धू व त्यांच्या सल्लागारांवर तोंडसुख घेतले होते.
कॉंग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाही, अशी टीका केवळ सिब्बल यांनीच नव्हे, तर जी-23च्या बंडखोर नेत्यांनी केली होती. कॉंग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका लवकरात लवकर होऊन पक्षाचा अध्यक्ष निवडला जावा, अशी मागणी जी-23च्या पत्रलेखकांनी केली होती. सोनियाजी या आजारपणामुळे पूर्णवेळ काम करू शकत नाहीत, हिंडू फिरू शकत नाहीत. सातत्याने बैठका घेऊ शकत नाहीत, हे जी-23 मधील बंडखोर नेत्यांचं मत होते आणि ते वास्तवाला धरूनही आहे. मात्र, तरीही आपण अध्यक्ष म्हणून पूर्णवेळ काम करत असल्याचा सोनियाजींचा दावा आश्चर्यकारक म्हणावा लागेल.
लोकसभा निवडणूक होऊन, अडीच वर्षे झाली, तरीदेखील कॉंग्रेसला अध्यक्षपदाचा निर्णय घेता येऊ नये आणि शिवाय त्याबद्दल कोणी बोलले, तर त्याला बंडखोर ठरवायचे, हे अजिबात पटणारे नाही. आता नवा अध्यक्ष 2022 मध्ये, म्हणजे एक वर्षाने निवडला जाणार आहे. या अगोदर गेल्या जूनमध्ये निवडला जाणार होता. कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीस 45 सदस्य उपस्थित होते आणि पुढील वर्षी पक्षांतर्गत निवडणुका होईपर्यंत सोनियाजीच पक्षाचे नेतृत्व करतील आणि त्यास गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा या जी-23 गटातील नेत्यांचीही सहमती आहे, असे कॉंग्रेसचे संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.
जी-23 मधील अनेक नेत्यांनी दीर्घकाळ राज्यसभेतील पदे उपभोगली आहेत. लोकांत जाऊन काम करण्याची अनेकांना सवय नाही. याउलट, राहुल व प्रियांका गांधी हे सातत्याने हाथरस असो, लखीमपूर असो, जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरतात, हे खरेच आहे. मात्र पक्षांतर्गत निवडणुका होऊन अध्यक्ष निवडण्यामुळे त्यास एक प्रकारची लेजिटिमसी प्राप्त होते. भाजपमध्येही अध्यक्ष वरून लादला जातो, मग आम्ही तसे केले तर काय बिघडले? असा सवाल केला जातो. परंतु भाजपमध्ये संघटने अंतर्गत निवडणुका होणे, ही प्रक्रिया नियमितपणे होते. मुळात या पक्षाची संघटना बांधणीच मजबूत आहे.
शिवाय आजही कॉंग्रेस हा पक्ष म्हणून एकसंधपणे लोकांसमोर येत नाही. तर कॉंग्रेस म्हणजे गांधी परिवार, अशीच प्रतिमा जनतेसमोर येते आणि त्याचा भाजपला टीका करण्यासाठी उपयोगही होतो. एक वर्षानंतर कॉंग्रेस अध्यक्ष जेव्हा निवडला जाईल, तेव्हा त्याचे नाव राहुल गांधीच असेल, यात शंका नाही.
जी-23 फोडण्यात सोनियाजींना यश आले असून, आझाद व शर्मा या दोन प्रमुख नेत्यांना त्यांनी आपल्या बाजूला वळवले आहे. राहुलजींनीच अध्यक्ष व्हावे, अशी एकमुखी मागणी करण्यात आली, हेदेखील कॉंग्रेसच्या परंपरेला धरूनच झाले. आता राहुल म्हणत आहेत, की मला यावर विचार करू द्या. राजीनामा देऊन इतका काळ लोटल्यानंतर या निर्णयाप्रत येण्यासाठी राहुलजींना पुन्हा वेळ हवा आहे. याचा अर्थ ऑक्टोबर 2022 मध्ये पुन्हा येईन, अशी घोषणा न करताही राहुलच पुन्हा येणार आहेत.
तोपर्यंत सोनियाजींच्या हंगामी अध्यक्षपदास तीन वर्षे झाली असतील. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतरही सर्व निर्णय बव्हंशी राहुलच घेत होते. वर्षभरात उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका पार पडतील. उत्तर प्रदेशात खरी लढत समाजवादी पार्टी आणि भाजप यांच्यातच आहे. बहुजन समाज पार्टीची भूमिका संदिग्ध असून, कॉंग्रेसला तेथे फारसे स्थान नाही.
लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्याची दुर्दैवी घटना घडली आणि तेथील शेकऱ्यांसाठी प्रियांका गांधी या लढत असल्या, तरी कॉंग्रेसकडे तेथे संघटनाच नाही. उत्तराखंडात कॉंग्रेसला विजय मिळू शकतो. परंतु पंजाबचे काही सांगता येत नाही. कारण तेथे आप मुसंडी मारण्याची शक्यता असून, नेतृत्वाच्या प्रश्नावरून कॉंग्रेसने तेथे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. “कॉंग्रेस कार्यकारिणी म्हणजे परिवार बचाव कार्यकारिणी’ असल्याचे भाजपने म्हटले आहे.
जिग्नेश मेवानी व कन्हैया कुमार यासारखे तरुण नेते कॉंग्रेसने घेतले असले, तरी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसला खिंडीत पकडण्यासाठी यामुळे भाजपला संधीच मिळणार आहे. जसजशी देशातील आर्थिक मंदी संपुष्टात येईल आणि करोनातून अर्थव्यवस्थाबाहेर येईल, तसतशी तुलनात्मकदृष्ट्या भाजपास अनुकूल स्थिती निर्माण होईल.
या पार्श्वभूमीवर, भाजपवर मात करायची असेल, तर कॉंग्रेसला पर्यायी आर्थिक-सामाजिक कार्यक्रम घेऊन लोकांपुढे जावे लागेल. ज्या ज्या राज्यांत कॉंग्रेस संघटना विकलांग आहे, तेथे तेथे सशक्तीकरण करण्यासाठी काय करावे लागेल, हे विचारात घेऊन त्वरेने उपाययोजना करावी लागेल. वेळ खूप कमी आहे.
नोंद
हेमंत देसाई