राहुल गोखले
गेल्या सहा दशकांत महाराष्ट्राने उल्लेखनीय औद्योगिक प्रगती केली आहे. पायाभूत सुविधा सुधारल्या आहेत आणि राज्याचे उत्पादन आणि उत्पन्न वाढले आहे. शेतीच्या बाबतीत देखील सारेच चित्र निराशाजनक आहे असे नाही. तथापि कोणत्याही राज्याची किंवा देशाची मोजणी ही केवळ आर्थिक गणितांनी होऊ शकत नाही. याचा अर्थ आर्थिक विकासाला दुय्यम महत्त्व आहे असे बिलकुल नाही. मात्र त्याबरोबरच राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांत महाराष्ट्राची वाटचाल ही व्यापकतेकडे आहे की संकुचितपणाकडे, समावेशकतेकडे आहे की संकिर्णतेकडे याबद्दलही विचार करणे आवश्यक आहे.
मूळात ज्याला “महाराष्ट्र धर्म’ म्हणतात त्यात वैविध्याला स्थान आहे. महाराष्ट्रात शतकांपूर्वीपासून आणि अगदी देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील ज्या परस्परविरोधी विचारधारांवर आधारित चळवळी उभ्या राहिल्या त्यांनी महाराष्ट्राला अधिक सजग, अधिक सहिष्णू बनविले. त्या वैचारिक चळवळी असोत किंवा सामाजिक चळवळी असोत, देशातील अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्र हा सर्जनशील राहिला आहे आणि याचे बीज जे मुक्त वातावरण असते त्यात आहे. ज्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या त्यातील काही संपल्या, काही दबल्या, काही सशक्त राहिल्या.
मात्र, एकाच समाजात जेव्हा अशा चळवळी उभ्या राहतात तेव्हा त्यातून जी सामाजिक आणि वैचारिक घुसळण होते त्याने समाजाचा पिंड घडत असतो. महाराष्ट्राने देशाला जवळपास सर्व क्षेत्रांतील नेतृत्व कधी ना कधी दिले आहे आणि याचेही कारण बहुधा हे असावे की महाराष्ट्राला गुणवत्तेची चाड होती. “जे जे उत्तम- उदात्त, उन्नत- महन्मधुर ते ते’ हा महाराष्ट्राचा व्यापक स्वभाव होता. याचा अर्थ या चळवळींना विरोध नव्हता असे नाही. तथापि त्या विरोधाला देखील एक भूमिका होती.
केवळ विरोधासाठी विरोध आणि पूर्वग्रहदूषितपणाने विरोध या भूमिका महाराष्ट्रात नव्हत्याच असे नाही. मात्र, त्यांचे प्रमाण कमी होते. बंडखोरी महाराष्ट्राला कुठल्याच क्षेत्रात नवी नाही. मात्र, त्या बंडखोरीत केवळ आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या ऊर्मीबरोबरच नवनिर्माणाची असोशी होती. महाराष्ट्र घडला आहे तो अशा घुसळणीतून आणि त्याचे कारण म्हणजे सर्वच क्षेत्रांत मिळालेले नेतृत्व. नेतृत्व हे केवळ राजकीय क्षेत्रात लागते हा भ्रम झाला. ते सर्व क्षेत्रांत लागते आणि ते जेवढे उत्तुंग तेवढी त्या चळवळीची उंची वाढत असते; परस्पर विरोधातदेखील केवळ कुरघोडीची अहमहमिका नसते तर एक प्रकारे परस्परांना आव्हान देऊन त्यातून सर्वोत्तमाची ओढ निर्माण करण्याची आस असते.
महाराष्ट्राने हे चित्र पाहिले आहे आणि देशातील अनेक राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र प्रागतिक राहिला आहे, त्याचेही बीज यातच आहे. हे प्रागतिकत्व केवळ सामाजिक क्षेत्रात असते असे नाही; ते सर्वच क्षेत्रांत असते आणि ते प्रागतिकत्व येण्यासाठी पुन्हा निःस्पृह नेतृत्व लागते. आपल्याला वैयक्तिक काहीएक लाभ होत नसतानादेखील विशिष्ट भूमिका म्हणून परंपरेला छेद देणारे नेतृत्व असते तेव्हा अनुनयापेक्षा उन्नयाला प्राधान्य राहते. महाराष्ट्राला वास्तविक अशी अभिमानास्पद पार्श्वभूमी मिळालेली आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या काही काळात यात निरंतर अधोगती तर होत नाही ना, याचे चिंतन आवश्यक ठरते.
गेल्या काही काळात या समावेशक, सहिष्णू आणि व्यापक दृष्टीत संकुचितता येऊ लागली आहे, हे उघड आहे. याचे कारण प्रत्येक क्षेत्राला राजकारणाने अत्यंतिक प्रमाणात पोखरले आहे. कोणत्याही गोष्टीचा विचार हा “आपला’ की “तुपला’ या झापडबंद आणि कप्पेबंद निकषांवर व्हायला लागला आहे आणि हे घातक आहे. गुणवत्तेची स्वीकारार्हता करण्यास गुणवत्ता सोडून कोणताही निकष असता कामा नये.
गुलाब टवटवीत फुलला आहे म्हटल्यावर तो कोणाच्या बागेत फुलला आहे याचा शोध घ्यायला जाणे म्हणजे केवळ सौंदर्यशोधक दृष्टीचा अभाव एवढाच अर्थ नाही तर मूळात सर्वोत्तमाची ओढ नाही याचे ते प्रमाण. यातून स्वीकारार्हतेचे निकष बदलतात आणि आपल्या त्रुटींचे देखील उदात्तीकरण आणि दुसऱ्याच्या गुणांचेही विकृतीकरण यांची स्पर्धा सुरू होते. अशा स्पर्धेत पहिला बळी गुणवत्तेचा जातो आणि स्पर्धा सुरू होते ती सवंगपणाची.
वस्तुनिष्ठतेपेक्षा व्यक्तिनिष्ठा वरचढ ठरू लागते. अशा वातावरणात मोकळेपणा राहत नाही आणि असे कोंडलेले वातावरण प्रगतीस मारक ठरते. बंडखोरीकडे नेहमी शंकेनेच पाहायचे आणि त्याभोवती संशयाचे वातावरण निर्माण करायचे अशा प्रघाताने प्रागतिक विचारांचा आवाज क्षीण झाल्याखेरीज राहणार नाही. महाराष्ट्राला याचे समाज म्हणून चिंतन करावयास हवे. परंपरांमधील सत्व जपून स्वीकारलेली नवीनता टिकाऊ असते; पण त्याबरोबरच नावीन्य स्वीकारण्याची खुली वृत्ती देखील आवश्यक असते.
क्षुद्र राजकारणाच्या आगीत आणि समाज माध्यमांतील कंटक त्यात ओतत असणाऱ्या तेलाने अशा उन्मुक्त विचारांचा संकोच होता कामा नये. राजकारणापलीकडे मोठा पैस आहे आणि महाराष्ट्राने जेव्हा राजकारणाला तेथे वरकडी करू दिली नाही तेव्हाच त्या क्षेत्रांचा उत्कर्ष झाला आहे. अर्थात,
या साठीचा ताठ कणा आणि विशाल मनाची गरज असते. महाराष्ट्राला याची परंपरा लाभली आहे. ताठ कण्यामध्ये आपल्या भूमिकेची कटिबद्धता दिसते तर विशाल मनामध्ये दुसऱ्याच्या मताच्या स्वीकारार्हतेचे औदार्य दृगोच्चर होते. महाराष्ट्राला सर्व क्षेत्रांत या गुणांचे नेतृत्व लाभलेले होते. दुर्दैवाने आताचे चित्र फारसे उत्साहवर्धक नाही. सगळेच ढासळलेले नसले तरी ढेपाळले आहे. साठीत महाराष्ट्राने याचे सम्यक आत्मचिंतन करणे आवश्यक आहे.