मुंबई : “महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आणि सरकार असल्यामुळे दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करत आहे, अशा परखड शब्दांत शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. आजच्या १ मे या महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने ही टीका केली आहे. राज्यातले लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबले आहे. ज्या महाराष्ट्रानं देशाला आर्थिक प्राणवायूचा पुरवठा केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवतो आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे”, अशा शब्दांत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, देशात सध्या महाराष्ट्राची लूट करण्याचे धोरण सुरू असल्याची टीका शिवसेनेने अग्रलेखातून केली आहे. “दिल्लीतील सरकारे बदलत राहिली, तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राचे हक्काचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबाडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले. राज्यातल्या अनेक योजना आणि प्रकल्प गुजरातला नेऊन ठेवले मुंबईचं महत्त्व कमी करायचं आणि राज्याची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू होता”, अशा शब्दांत टीका करण्यात आली आहे.
“गुजरात राज्यात करोना रुग्ण रस्त्यांवर तडफडून प्राण सोडताना दिसत आहेत. हे विदारक दृष्य आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले. पण त्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आजही होतच आहे. गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे”, असे अग्रलेखात म्हटले आहे.
“महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही,. महाराष्ट्राला इथिहास आहे, बूड आहे म्हणून तो टिकला आहे. आज महाराष्ट्रावरचं संकट मोठं आहे. करोना विषाणूने मोठं आव्हान उभं केलं आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी पडझड होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील आणि विजयी होईल!”, असे देखील सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.