नवी दिल्ली – कोणताही राजकीय पक्ष हा कुणाचीच खासगी मालमत्ता नसते. तसेच शिवसेनादेखील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, यामुळे कुणीच आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नये, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. आम्हाला जनतेने समर्थन दिले. ग्रामपंचायत निवडणुकीतही ठाकरे गट सहाव्या क्रमांकावर पोहचला.
आम्ही मिंधे नाही, आम्ही बाळासाहेबांचे खंदे लढवय्ये आहोत. आम्हाला अस्मान दाखवू म्हणणाऱ्यांना आम्ही 3 महिन्यापूर्वीच अस्मान दाखवले. आम्ही ठेचा खावून मोठे झालो, म्हणूनच आम्ही त्यांना ठेचले. आम्हाला बाप चोरणारी टोळी म्हणता पण आपण बापाचा पक्ष आणि विचार विकणारे तुम्हाला म्हणावे का? असे जोरदार प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिले.
महाराष्ट्राबाहेरील शिवसेनेच्या शक्तिप्रदर्शनासाठी आणि शिवसैनिकांना एकवटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दिल्लीतील महाराष्ट्र सदनमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला मुख्यमंत्री शिंदेंनी संबोधन केले.
खुर्चीच्या लालसेपोटी भाजपला दूर करून शिवसेना पक्षप्रमुखांनी राष्ट्रवादी, कॉंग्रेसशी संधान साधून सत्ता स्थापन केली. सरकार आमचे पण आमच्याच लोकांवर या सत्तेत अन्याय सुरू होता. आमचे लोक जेलमध्ये टाकले जात होते, राष्ट्रवादी, कॉंग्रेससोबत असूनही शिवसेनेवर अन्याय झाला असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज सायंकाळी दिल्लीत केला. मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना -भाजपचे सरकार स्थापन करू हे आम्ही जनतेला आश्वासन दिले, पण प्रत्यक्षात दुसऱ्यांशीच घरोबा केला. ही जनतेशी प्रतारणा होती, जनतेने भाजप-शिवसेनेला मते दिली होती म्हणून आम्ही भाजपसोबत युती केली आणि सरकार स्थापन केले.
बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. सर्व लोकांनी मला सांगितले की, राज्यात परिवर्तनाची गरज आहे. आम्ही परिवर्तन केले. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना माननारे शिवसैनिक आहे. आम्ही आनंद दिघेंच्या मार्गावर चालणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही उठाव केला. शिवसेनेला कसे पुढे न्यायचे हे सर्व आपणास माहीत आहे.
भेटीगाठी व्हायला हव्या हे महत्त्वाचे आहे. बाळासाहेबांच्या विचारधारेला राज्याबाहेर पुढे नेण्याचे काम तेथील शिवसैनिक करीत आहे. जगातील 33 देशांनी आमच्या उठावाची दखल घेतली. सत्तेसाठी नव्हे तर आम्ही न्यायासाठी उठाव केला.