सातारा – राजवाडा परिसरातील पंचपाळी हौदासमोर भाजी विक्री करण्यासाठी पथारी मांडण्यावरून महिला विक्रेत्यांचा परस्परांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसन भांडणात होऊन तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजवाडा परिसरातील राजधानी टॉवरसमोर बघ्यांची गर्दी जमून काही काळ वाहतुकीची कोंडी तर झालीच आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने तात्काळ घटनास्थळी येऊन संबंधित महिलांचा भाजीमाल आणि वजन काटे जप्त करण्याची कारवाई केली.
सातारा शहरात सार्वजनिक मोकळ्या जागांचा बेकायदेशीर पद्धतीने वापर करून स्वतःची तुंबडी भरण्याची खोड गेलेली नाही. राजवाडा परिसरातील पंचपाळे हौदासमोर काही खाद्यपदार्थांचे स्टॉल सुरू झालेले असताना आता त्याच्यालगत भाजी विक्रेत्यांच्या पथाऱ्यासुद्धा दिसू लागल्या आहेत. बुधवारी याच मुद्द्यावरून चार महिला विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. प्रकरण इतके घाईला आले की रस्त्यावरच भांडण सुरू झाले.
अचानक सुरू झालेल्या या प्रकाराने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे राजधानी टॉवर परिसरात वाहतुकीची कोंडी झाली. पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे निरीक्षक प्रशांत निकम आपल्या यंत्रणेसह तेथे हजर झाले. संबंधित महिलांच्या भाजीमालाच्या डालग्या आणि वजन काटे त्यांनी तात्काळ जप्त केले. काही दिवसांपूर्वी या परिसरातील एका बहाद्दराने राजकीय नेत्याचे नाव सांगून रस्त्यावरच टेबल मांडून विक्री सुरू केली होती. त्यावर पालिकेच्या शहर विकास विभागाने आक्षेप घेऊन त्याच्यावर कारवाई केली.