नवी दिल्ली – देशातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कुठे थंडीचा कडाका तर कुठं ढगाळ वातावरण आहे. तर काही भागात हलका पाऊस पडत असल्याचेही चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (आयएमडी) उत्तर भारतातील अनेक राज्यातील किमान तापमानात घट होत आहे. दिल्लीतील किमान तापमान ४.९ अंश सेल्सिअसवर गेले आहे. दिल्लीतील किमान तापमान शिमल्यापेक्षाही कमी आहे. शिमल्यातील किमान तापमान ६.८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.
पंजाबमधील अनेक शहरांमध्ये दृश्यमानता घटली आहे. हरियाणातील हिसारमध्ये ४.२ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. एकापाठोपाठ एक वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे तापमानात घट होत असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसात देशभरातील किमान तापमानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित नाही. आठवड्याच्या शेवटी दिल्लीत किमान तापमान ६ किंवा ७ अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता आहे.
हिसारबरोबरच उत्तर प्रदेशातील बरेली येथेही किमान तापमान ४.६ अंश नोंदवले गेले. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काही ठिकाणांपेक्षा राष्ट्रीय राजधानी थंड होती. कारण शिमल्यात शुक्रवारी सकाळी किमान तापमान ६.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. मसूरी येथे किमान तापमान ६.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राजस्थानच्या काही भागात दिल्लीपेक्षा जास्त किमान तापमान नोंदवले गेले. यापैकी चुरुमध्ये ७.४ अंश, तर जोधपूरमध्ये किमान तापमान १०.३ अंशांवर नोंदवले गेले.