कराड – सहकार मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी, मंगळवारी 21 जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. आता याबाबतची औपचारिक घोषणा केवळ बाकी आहे.
ना. पाटील चेअरमन असलेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 167 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर 143 अर्ज शिल्लक राहिले होते. त्यानंतर तीन उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने 140 अर्ज शिल्लक राहिले होते. सहकार मंत्र्यांच्या कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका घेत ना. पाटील यांचे कट्टर विरोधक मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांनीही ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी आपापल्या समर्थकांच्या बैठका घेऊन त्यांना आपली भूमिका समजावून सांगितली होती.
त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. अखेर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 119 उमेदवारांनी आपले अर्ज काढून घेतले. त्यामुळे 21 जागांसाठी ना. बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलच्या 21 उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ना. शामराव तथा बाळासाहेब पांडुरंग पाटील, यशराज शामराव पाटील, रामचंद्र जगन्नाथ पाटील, माणिकराव रामचंद्र पाटील, सुरेश नानासाहेब माने, बजरंग पांडुरंग पवार, सर्जेराव वसंतराव खंडाईत, दत्तात्रय बाबुराव जाधव, रामदास अंतू पवार, शंकर बंडू चव्हाण, मानसिंगराव वसंतराव जगदाळे, संतोष शिदोजीराव घाडगे, लालासाहेब विश्वासराव पाटील, कांतिलाल बाजीराव भोसले, वसंत मारुती कणसे, अविनाश जयवंतराव माने, महिला राखीव गटात शारदा हनुमंत पाटील, लक्ष्मी संभाजीराव गायकवाड, अनुसूचित जातीजमाती गटात जयवंत संपतराव थोरात, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गात लहू गणपती जाधव, इतर मागास प्रवर्गात संजय दत्तात्रय कुंभार यांची संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक बिनविरोध झाल्याने कारखान्याचे पदाधिकारी, सभासद आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.