ग्रामसभेत घेतला निर्णय : पूजाअर्चा नियमित होणार
दावडी – अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या निमगाव खंडोबा येथे सोमवती अमावस्ये निमित्त कुलदैवताचे दर्शन घेण्यांसाठी अनेक भाविक गर्दी करत असतात. दरम्यान, करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निमगाव खंडोबा मंदिर मंगळवार (दि. 17) पासून पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद राहणार आहे. तर सोमवारी (दि. 24) सोमवती अमावस्या असून सोमवती यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी (दि. 17) झालेल्या ग्रामसभेत घेण्यात आला आहे. दरम्यान, खंडोबाची नियमित पूजाअर्चा सुरू राहणार आहे.
सध्या देशभर तसेच महाराष्ट्रातही करोनाचा प्रादुर्भाव व त्यावर उपाय योजना करण्यासाठी शासनाने घेतलेल निर्णयाचे राज्याबाहेर व राज्यातही पालन केले जात आहे. सोमवती अमावास्या निमित्त काना-कोपऱ्यातून लाखो भाविक निमगाव येथे कुलदैवत खंडोबाचे दर्शन करण्यासाठी येत असतात.
मात्र, यावेळी भाविकांना दर्शन घेता येणार नाही. रविवारी (दि. 23) व सोमवारी (दि. 24) असे दोन दिवस अमावस्या येत असल्याने भाविकांची संख्या ही वाढणार आहे,त्यामुळे या भागात गर्दी वाढणार असून करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.
सोमवती अमावस्ये निमित्ताने सकाळी देवाला शाही आंघोळ घालण्यात येत, देवाची विधीवत पुजा, अभिषेक, होम, हवन केले जातात , खंडेरायाची पालखी मंदिरापासून ते भिमा नदीपर्यंत ढोलताशा, देवाचा अश्व, वाजंत्रीसह मिरवणूक काढण्यात येत असते; मात्र यात्रा कमिटी व निमगाव ग्रामस्थ यांच्या एकविचाराने येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी सहकार्य करावे आणि सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा व पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे त्यामुळे कोणीही भाविकांनी दर्शनाचा आग्रह करू नये, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. यावेळी जय मल्हार यात्रा कमिटी अध्यक्ष बबनराव शिंदे, पोलीस पाटील बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच बबनराव शिंदे, बबनराव थोरात, संतोष शिंदे, मनोहर गोरगल्ले, केशव तांबे व ग्रामस्थ उपस्थित होते.