नवी दिल्ली – देशात करोनावर आळा घालण्यासाठी वेगाने लसीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये काही लसीचा एक डोस दिला जातो तर काही लसींचे दोन डोस दिले जातात. तसेच बुस्टर डोस म्हणून लसीचा तिसराही डोस दिला जातो आहे. मात्र लसीचे नेमके किती डोस घ्यायला हवे याबाबत सर्वसामान्यांमध्ये अजूनही संभ्रम निर्णाम झाला आहे.
असे असताना ‘लान्सेट’च्या यासंदर्भात संशोधन करून एक शोधनिबंध तयार केला असून त्यामध्ये दोन्ही डोसनंतरही शरीरातील कोरोनाविरूद्धची ॲन्टीबॉडी कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतातही कोरोनाप्रतिबंधक लसीचा तिसरा डोस दिला जाणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
यासंदर्भात केरळ मधील कन्नूर येथील लसीचा तिसरा डोस दिला जावा यासाठी गिरीश कुमार यांनी कोर्टात याचिका केली होती. या याचिकेची सुनावणी करण्यात आली असून यावेळी केंद्राकडून तिसरा डोस दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तिसऱ्या डोसबाबात अद्याप कोणतीही मार्गदर्शक सूचनाही नाहीत. त्यामुळे लसीचा तिसरा डोस देता येणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्र सरकारने केरळ उच्च न्यायालयात दिले आहे. तसेच तिसरा डोस घेतल्यानंतर लसीच्या अतिवापरामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर तिसऱ्या डोसबाबत निर्णय घेण्यात येईल. असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.