नगर -राज्यातील शासकीय शाळांचे खासगीकरण करणार अशी चर्चा काही दिवसापासून राज्यात सुरू आहे. मात्र शासकीय शाळा खासगीकरण करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य शासनाचा नसून या चुकीच्या चर्चा राज्यात सुरू आहे. शिक्षणमंत्री महोदयांच्या म्हणण्यानुसार सी.आर.एस. फंडातून काही शाळांच्या इमारतीची दुरुस्ती करावी, आणि इरामराती देखभाल दुरुस्ती करावी, मात्र ती शाळा शासनाचीच राहील, असे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रधानमंत्री यांच्या संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. तसेच त्यापूर्वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी खा.डॉ. सुजय विखे, माजी आमदार वैभव पिचड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवाशंकर आदी उपस्थित होते.
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे होणाऱ्या संभाव्य कार्यक्रमात विविध विकास कामांचे उद्घाटन 26 ऑक्टोबर रोजी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात यावे. तसेच प्रत्येक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समन्वय राखत त्यांना नेमून देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश महसूलमंत्री यांनी दिले.
पालकमंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचबरोबरच या कार्यक्रमामध्ये विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटपही करण्यात येणार असल्याने लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कार्यक्रम स्थळी आणण्याची व परत सोडण्याची वाहतूक व्यवस्था करावी. कार्यक्रम स्थळी भोजन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी आदि सर्व सुविधांचे सुक्ष्म नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवावी. प्रधानमंत्री थांबणार आहेत त्या विश्रामगृह तसेच कार्यक्रमस्थळी पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात यावा. सुरक्षा व्यवस्थेबाबत ब्लू बुक मधील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये होत असलेल्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षपणे काम करावे. या काळामध्ये कुठल्याही अधिकारी, कर्मचाऱ्याने विनापरवानगी मुख्यालय न सोडण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्हाधिकारी म्हणाले की, प्रधानमंत्र्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभागाकडे जबाबदारी सोपविण्यात येणार असुन तसे आदेशही निर्गमित करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.