नवी दिल्ली – डेल्टा व्हेरियंटमुळे आलेल्या दुसऱ्या लाटेने देशात हाहा:कार माजवला होता. ऑक्सिजन बेड आणि इतर अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे या काळात अनेकांना आपले प्राण गमावले लागले. सध्या देशातील परिस्थिती सर्वसाधारण होण्याच्या मार्गावर असताना आता देशावर डेल्टा प्लस व्हेरियंटे संकट घोंघावत आहे.
या नवीन विषाणूचे देशात 40 तर एकट्या महाराष्ट्रात 21 रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या विषाणूमुळे देशात करोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहेत. यासंदर्भात एनडीटीव्ही वृत्तवाहिनीने द इंस्टीट्यूट ऑफ जिनोमिक्स एण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलाॅजीचे (IGIB) डाॅ. अनुराग यांची विशेष मुलाखत घेतली.
डाॅ. अनुराग म्हणाले, तिसऱ्या लाटेची काळजी करण्यापेक्षा आपण दुसऱ्या लाटेवर लक्ष द्यायला हवे. देशातील करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले तरिही ती पूर्णपणे संपलेली नाही. अशा परिस्थितीत आपण निष्काळजीपणा करू नये. डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे तिसरी लाट येऊ शकते, याबाबत अद्याप कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे दुसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी नियमांचे पालन करणे महत्वाचे आहे.