मुंबई – याला सरकार म्हणता येईल का? मंत्री आपल्या विभागाचे राजे, प्रत्येक विभागात एक एक वाझे..ही अवस्था महाराष्ट्राची आपल्याला पाहायला मिळते. गेल्या 60 वर्षात जितका भ्रष्टाचार बघितला नाही तितका आता दिसतोय, असा जोरदार हल्लाबोल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पोलीस विभागातला वाझे आपल्याला सापडला. वेगवेगळ्या विभागतले वाझे अजून बाकी आहेत. त्यांचा पत्ता आमच्याकडे आलेला आहे, असा इशाराही फडणवीस यांनी दिली.
कुठल्याही सरकारला एक मुख्यमंत्री असतो, इथे काही मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजून काम करत आहेत. या सरकारमध्ये रोज नवे निर्णय होतात, एका तासात त्या निर्णयाला स्थगिती मिळते आणि पुन्हा मंजुरी दिली जाते, हे सरकार आहे की सर्कस आहे?, असा टोलाही यावेळी फडणवीस यांनी लगावला आहे.
प्रदेश कार्यसमिती बैठकीप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे संबोधन. https://t.co/CdJNlZD4nJ
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 24, 2021
राज्य सरकारला आव्हान –
सरकारमधल्या कोणत्याही मंत्र्याने माझ्यासोबत डिबेट करावं असं थेट आव्हान फडणवीस यांनी दिलं आहे. भ्रष्टाचार आणि गोंधळ बाहेर येईल म्हणून सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.
ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं. सरकारमधील आमदारांच्या मुलानंच ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली. आरक्षण रद्द होणं हे महाविकास आघाडीचं पाप असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.
मृत्यूच्या सापळ्याचं महाराष्ट्र मॉडेल
कोविड काळामध्ये महाराष्ट्राची काय अवस्था झाली. कोविड काळात सरकारनं चांगलं काम केलं असं मंत्री आणि काही माध्यमं सांगतात. तेव्हा त्यांना सांगावसं वाटतं. तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?. देशात सर्वाधिक करोना रुग्ण महाराष्ट्रात होते. किड्या मुंग्यासारखे लोकं मेली. कुठलं मॉडेल आणलं आहे. यशाचं मॉडेल आणलं आहे. मॉडेल जर असेल तर मृत्यूच्या सापळ्याचं मॉडेल आहे. या मृत्यूंचं उत्तर कोण देईल?. उत्तर प्रदेशाच्या गंगा नदीत ५० मृतदेह सापडले. तर दोन दिवस महाराष्ट्रात बातम्या चालतात. बीड जिल्ह्यात २२ मृतदेह कोंबून एका गाडीत त्याची विटंबना केली जाते. त्या संदर्भात काही लोकं मात्र मौन आहेत. बोलत देखील नाहीत. हे मॉडेल आहे, असे म्हणत करोना काळातील महाराष्ट्र मॉडेलवरही देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं.