नवी दिल्ली – बजरंग पुनियने पंतप्रधान निवासस्थानाबाहेर पद्म पुरस्कार सोडल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. एखाद्याने अशा प्रकारे आपला पुरस्कार परत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही वर्षांत अनेकांनी पद्म पुरस्कार परत केले आहेत. असे असूनही, पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीत बजरंग पुनिया कायम राहील, कारण हा सन्मान परत करण्याची कोणतीही तरतूद नाही.
याबाबत राष्ट्रपती भवनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, पद्म पुरस्कार विजेता काही कारणास्तव सन्मान परत करण्याची घोषणा करू शकतो. मात्र हे पुरस्कार परत घेण्याची कोणतीही यंत्रणा सरकारकडे नसते. कोणताही पद्म पुरस्कार रद्द करण्याची परवानगी फक्त राष्ट्रपतीच देऊ शकतात.
एकदा जाहीर झाल्यानंतर सर्व पुरस्कार विजेत्यांची नावे रजिस्टरमध्ये कायमच्या नोंदीत राहतात. आजवर स्वत: राष्ट्रपतींनी एकही पद्म पुरस्कार रद्द केल्याची घटना घडलेली नाही. वर्ष २०१८ मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी राज्यसभेत सांगितले होते की, देशातील तपास यंत्रणांकडून चारित्र्य पडताळणीनंतरच हे पुरस्कार दिले जातात.
साधारणपणे, पद्म पुरस्काराने सन्मानित करण्याचा प्रस्ताव असलेल्या व्यक्तीची इच्छा घोषणेपूर्वी निश्चित केली जाते. एखाद्या व्यक्तीला पद्मविभूषण, पद्मभूषण किंवा पद्मश्रीने सन्मानित केल्यानंतर, त्याचे नाव भारताच्या राजपत्रात प्रकाशित केले जाते, ज्याची एक रजिस्टर देखील ठेवली जाते. पुरस्कार विजेता स्वत: नंतर पद्म पुरस्कार परत करत असले तरी त्याचे नाव राजपत्रात किंवा पुरस्कार विजेत्यांच्या रजिस्टरमध्ये कायमच राहते.
पद्म पुरस्कार परत करणाऱ्यांच्या यादीत पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि माजी केंद्रीय मंत्री एसएस धिंडसा यांचाही समावेश आहे. २०२० मध्ये राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले होते की ते तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आहेत आणि स्वेच्छेने पुरस्कार परत करत आहेत.
असे असूनही त्यांचे नाव पद्म पुरस्कार विजेत्यांच्या यादीत आहे. असे पुरस्स्कार जाहीर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीचा होकार घेतलेला असतो. पुरस्कार घ्यायचा आणि काही वर्षांनी परत करायचा, यापेक्षा पुरस्कार स्वीकारायलाच नकार देणे योग्य ठरु शकते, असे हा अधिकारी म्हणाला.