नवी दिल्ली – इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) पुढे ढकलण्यात आल्यामुळे निराश झालेलो नाही, तर या लीगपेक्षाही देशातील नागरिकांचे आरोग्य जास्त महत्त्वाचे, असे प्रतिपादन किंग्ज इलेव्हन पंजाबचे सहमालक नेस वाडिया यांनी केले आहे. आज देशात करोनाचा कहर सुरू असताना क्रिकेटचे सामने खेळविणे योग्य नाही, सामने पाहण्यासाठी येणाऱ्याचे आरोग्य धोक्यात घालून स्पर्धा भरविणे पटत नाही, असे वाडिया यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंच्या धोक्यामुळे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) ही स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली असली तरी, आता येत्या काळात या करोनाचा प्रसार कसा होतो, तसेच त्यावर काही उपाय निघेल का, या सर्व शक्यता पाहता यंदा ही स्पर्धा रद्दच होण्याची शक्यता जास्त दिसत आहे. एकीकडे देशातील नागरिकांचे आरोग्य तर दूसरीकडे स्पर्धेच्या रद्द होणारे आर्थिक नुकसान अशी परिस्थिती असताना निर्णय काय घ्यायचा हे देखील एक कोडे बनले आहे.