कोपरगाव: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तसेच शहरातील रहदारीला अडथला होऊ नये म्हणून शहराचा आठवडा बाजार तीन विभागात भरविण्याचे पालिका प्रशासनाने ठरवले त्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यापासून शिपायापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांनी दोन दिवस परिश्रम घेऊन नव्याने तयार केलेल्या बाजार ओट्यावरती बाजार भरविण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यासाठी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी हि सहकार्य केले. परंतु पालिका कर्मचारी व पोलिसांची पाठ फिरल्या बरोबर भाजी पाला विक्रेते ,शेतकरी,व्यापारी यांनी पुन्हा बाजार रस्त्यावर भरवून पालिकेचे प्रयत्न व्यर्थ ठरविले.
दरम्यान सोमवारी आठवडे बाजारच्या दिवशी पहाटे पासून पालिका कर्मचार्यांनी राघोजी भांगरे आठवडे बाजार ओटे स्वच्छ करून प्रत्येक ओट्यावार विजेची व्यवस्था केली. जे सी बी ने परिसरातील काटवन काढून स्वच्छता केली. तीनशे ओटे हे पालिकेने सर्व सोईसुविधांनी उपलब्ध करून दिले. विक्रेत्यांना त्याठिकाणी बसण्यासाठी प्रबोधन केले. नगराध्यक्ष विजय वहाडणे ,उपनगराध्यक्ष योगेश बागुल ,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे ,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,सभापती स्वप्नील निखाडे ,दिनेश कांबळे ,पालिकेचे सर्व अधिकारी ,कर्मचारी यांनी हि व्यापारी व नागरिकांना मार्गदर्शन करून बाजार नव्या ओट्यावार भरविण्याची विनंती केली. त्यानुसार दुपारी एक वाजेपर्यंत भाजी विक्रेते ओट्यावर बसले मात्र खरेदीसाठी ग्राहक येत नसल्याने अखेर वैतागलेल्या विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यावर बाजार मांडून पालिकेच्या या प्रयत्नांना व्यर्थ ठरविले. यावेळी काही व्यापारी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणले कि, नागरिकांना रस्त्यावर खरेदी करण्याची सवय लागली आहे त्यामुळे आमच्याकडे कोणी फिरकायला तयार नाही. सकाळी असलेला ताजा माल बोहनी न होता वाळून चालला म्हणून शेवटी नाईलाजास्तव आम्हाला हि रस्त्यावर यावे लागले. त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले बाजारओटे ओस पडले .पालिकेचे अधिकारी मात्र सायंकाळ पर्यंत पुन्हा बाजार ओट्यावर भरविण्यासाठी प्रयत्न करीतच होते.
कोरोना विषाणूच्या धसक्याने नागरिक गर्दीच्या ठिकाणी येण्यास टाळाटाळ करीत आहेत त्याचा परिणाम आठवडे बाजाराच्या गर्दीवर देखील दिसून आला. भाजीपाला जीवनावश्यक असून हि नागरिकांनी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. विक्रेत्यांचा माल त्यामुळे पडून राहिला आहे.