मुंबई – महाराष्ट्र विधान परिषदेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नागपूरसह चार जागा जिंकून सत्ताधारी महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला आहे. पक्षाने अकोला-बुलढाणा-वाशीम ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेतली. भाजपच्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपने महाविकास आघाडीला चपराक दिली आहे. सहा पैकी चार जागी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. तीन पक्ष एकत्र आले म्हणजे सगळ्या प्रकारचा विजय होऊ शकतो असं जे गणीत मांडलं जात होतं ते चुकीचं आहे हे या विजयाने स्पष्ट केलं आहे. निर्णायक विजय मिळाला आहे याचा आनंद आहे, या विजयाने आमच्या भविष्यातील विजयांचा पाया घातला आहे, असे फडणवीस म्हणाले.
निवडणूक आयोगाने 10 डिसेंबर रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या सहा जागांसाठी मतदान जाहीर केले होते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दोन जागांवर शिवसेना (सुनील शिंदे) आणि भाजप (राजहंस सिंह) यांनी प्रत्येकी एक जागा बिनविरोध जिंकली. कोल्हापूर आणि नंदुरबार-धुळे विधानपरिषद निवडणुकीतही काँग्रेस आणि भाजपने अनुक्रमे प्रत्येकी एक जागा जिंकली. नागपूर आणि अकोला-बुलढाणा-वाशीम या जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान झाले होते.
जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नागपुरात झालेल्या 554 मतांपैकी भाजपचे उमेदवार आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना 362 मते मिळाली, तर मंगेश देशमुख या अपक्ष उमेदवाराला 186 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर यांनी मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शवली होती, त्यानंतर पक्षाने देशमुख यांना पाठिंबा दिला. मात्र, नंतर भोयर यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना एकच मत मिळाले. अकोला-वाशिम-बुलढाणामध्ये शिवसेनेचे तीन वेळा आमदार राहिलेले गोपीकिशन बाजोरिया यांचा भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्याकडून पराभव झाला. एकूण 808 मतांपैकी खंडेलवाल यांना 443 तर बाजोरिया यांना 334 मते मिळाली.