मुंबई : खारपाणपट्ट्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेची मान्यता शिंदे-फडणवीस सरकारने रद्द केल्यानंतर बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायी ‘संघर्ष यात्रा’ काढली. खाऱ्या पाण्याचा टँकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर उभा करणार असल्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला होता. त्यानंतर आता नितीन देशमुखांना नागपूरच्या वेशीवर ताब्यात घेतलं आहे. त्यावरूनच खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत ट्विट केले आहे.
पोलिसांनी नागपुरात येण्यापूर्वीच नितीन देशमुखांना ताब्यात घेतले आहे. त्यावेळी पोलिसांनी देशमुखांना अक्षरश: फरफटत नेऊन गाडीत घेऊन गेले. या सर्व घडामोडीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत सरकारवर टीकास्र सोडले आहे.
पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या
आमदार नितीन देशमुखना अटक झाली.नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले.
खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले.आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या.महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली
सरकार जनतेलाच घाबरु लागले!— Sanjay Raut (@rautsanjay61) April 20, 2023
“पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखांना अटक झाली. नागपूरच्या हद्दीबाहेर पोलिसांनी त्यांना रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी आक्रोश केल्याने अटका केल्या. महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली आहे. सरकार जनतेलाच घाबरु लागले!,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना खारपाणपट्ट्यात येणाऱ्या बाळापूर तालुक्यातील ६९ गावांना गोड्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. त्याचे कामही सुरू झाले होते. त्यासाठी वान धरणातील पाणी ६९ गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी आरक्षित करण्यात आले. पण, याला तेल्हारा तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनी विरोध केला. त्यानंतर स्थानिक भाजपा लोकप्रतिनिधींनी ही योजना रद्द करण्यासाठी पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला. फडणवीसांनीही या पाणी पुरवठा योजना रद्द केली. यावरून आता नितीन देशमुखांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे.