निमसाखर -विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबरच व्यवहारिक ज्ञानाची जाण येण्यासाठी आनंदी बाजार व हळदीकुंकू सारखे अन्य स्तुत्य उपक्रम गरजेचे आहेत. येथील विद्यार्थी हुशार, खेळातही तरबेज असल्यामुळे मानेवस्ती शाळा लय भारी आहे, असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रवींद्र पोळ यांनी व्यक्त केले.
निरवांगी (ता. इंदापूर) येथील कळंब-बावडा रस्त्यालगत मानेवस्ती येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेमध्ये इयत्ता 1 ते 4 पर्यंत सुमारे 70 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. यावेळी शाळेच्या आवारात नुकतेच आनंदी बाजाराचे व हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शाळा व्यवस्थपन समितीचे अध्यक्ष योगेश्री राहुल गुरव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य महावीर गांधी, संतोष पोळ, नीलेश गांधी, सोपान माने, सुहास गुरव, राजू कांबळे, संजय शेंडे, दादा माने, धनंजय माने, नीलेश माने, अनंत माने, प्रमोद काशीद, नारायण रासकर, मुख्याध्यापक शांताराम रणवरे यांसह बचत गटातील महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.