सांगली -मुंबईतून आंधळी (ता. पलूस) येथे आलेल्या करोनाबाधित महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. तर मंगळवारी आणखी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे करोनाबाधिताचीं संख्या 259 इतकी झाली आहे. यापैकी 115 जणांवर मिरज करोना रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर मृतांची संख्या 9 इतकी झाली आहे.
आंधळी येथे मुंबईतील घाटकोपर येथून 67 वर्षीय महिला पाहुण्यांकडे आली होती.
या महिलेमध्ये लक्षणे आढळून आल्याने तिला मिरज करोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा उपचारादरम्यान मंगळवारी दुपारी मृत्यू झाला. या महिलेचा मंगळवारी सायंकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, मंगळवारी आणखी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये मणदूर (ता. शिराळा) येथील 4, मौजे डिग्रज ता. मिरज येथील 42 वर्षीय महिला आणि आंधळी येथील 1 अशा सहा जणांचा समावेश आहे. यापैकी आंधळीतील महिलेचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी रात्री उशिरा मणदूर येथील 5 महिन्यांच्या मुलीला अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तसेच खेड (ता. शिराळा) येथील बाधित व्यक्तीच्या 12 वर्षीय मुलाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.बिळाशी (ता. शिराळा) येथील 60 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलो. भिकवडी (ता. खानापूर) येथील पॉझिटिव्ह व्यक्तीची 48 वर्षीय पत्नी तसेच या कुटुंबातीलच 33 वर्षीय महिलेचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील 50 वर्षीय महिला रविवारी बाधित होती. या महिलेच्या 60 वर्षीय पतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात मंगळवारअखेर पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 259 झाली आहे. आजअखेर त्यातील 115 व्यक्तींनी करोनावर मात केली आहे. पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे.