नवी दिल्ली –जपानमध्ये येत्या जुलैत होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताचे नऊच मुष्टियोद्धे पात्र ठरले आहेत. करोनाचा धोका काही देशांत वाढत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध महासंघाने पात्रता फेरीच रद्द केल्यामुळे भारताच्या अनेक खेळाडूंना पात्र होता येणार नसल्याने केवळ आतापर्यंत पात्र ठरलेले नऊच खेळाडू टोकियोला रवाना होतील.
पात्रता फेरी झाल्यानंतर जूनमध्ये पॅरिस येथे जागतिक पात्रता फेरी होणार होती. ऑलिम्पिकसाठी ही अखेरची पात्रता फेरी होती. या अखेरच्या पात्रता फेरीतून 53 खेळाडूंचा कोटा भरला जाणार होता. यात पुरुषांसाठी 32 तर, महिलांसाठी 21 जागांचा कोटा ठेवण्यात आला होता.
आता हा कोटा आफ्रिका, अमेरिका, आशिया-ओशियाना आणि युरोप या चार विभागात सर्व वजनगटांसाठी समान देण्यात येईल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मुष्टियुद्ध टास्क फोर्सच्या वतीने देण्यात आली. महासंघावर गैरव्यवस्थापनाचा ठपका असल्यामुळे त्यांच्या पात्रता फेरी या समितीच्या वतीने घेतल्या जात आहेत.
भारताकडून अमित पंघल (52 किलो), मनिष कौशिक (63 किले), विकास क्रिशन (69किलो), आशिष कुमार (75 किलो), सतिश कुमार (91 किलोपेक्षा अधिक), मेरी कोम (51 किलो), सिमरनजीत कौर (60 किलो), लोवलिना बोर्गोहेन (69 किलो), पूजा राणी (75 किलो) या खेळाडूंनी पात्रता मिळवली आहे.