संगमनेर -संगमनेर तालुक्यातील निमज गावात बुधवारी रात्री मोठ्या प्रमाणात अवैध वाळू साठा जप्त करण्यात आला. अवैध वाळू उपसा करून गावातच त्याची साठेबाजी करण्यात आली होती. साठविलेल्या वाळूचा पंचनामा करण्यात आला. ज्याठिकाणी वाळू उपसा करण्यात आला. त्याठिकाणी जवळच शेती असल्याने अनेकांच्या शेतीचेही नुकसान या तस्करांनी केली असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
तालुक्यातील निमज येथे नदीच्या कडेलाच काही शेतकऱ्यांची शेती आहे. वाळू तस्करांनी बुधवारी रात्री वाळूचा उपसा केला. यात निमज येथील एक तर राजापूर गावातील एक असे दोन वाळू तस्करांनी प्रवरा नदीत रात्रभर अवैध वाळूची तस्करी केली. शेतीला लागूनच नदी पात्र असल्याने ट्रॅक्टर भरून जात असताना ते ट्रॅक्टर शेतीमध्ये घुसून पिकांचे नुकसान करत होते. याबाबत स्थानिक तलाठी यांनाही कोणीतरी फोन करून माहिती दिली, परंतु नेहमीप्रमाणे त्यांनी दुर्लक्ष केले. खांडगाव, निमज आणि धांदरफळ परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असतानाही मंडलाधिकारी आणि स्थानिक तलाठी हे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, गावातील काही शेतकऱ्यांनी दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीशी संपर्क करून झालेल्या शेतीच्या नुकसानी बद्दल सांगितले असता त्यांनी ती माहिती प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना दिल्याने त्यांनी लागेलच स्थानिक तलाठ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार निमज गावामध्ये साठवणूक केलेली वाळूचा पंचनामा करण्यात आला असून आता महसुल विभाग ज्याचे बांधकाम आहे. त्याच्यावर की मुजोर वाळू तस्करांवर कारवाई करणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे ते शेतकरीही भरपाई मिळावी, अशी मागणी करत आहेत.
रात्री स्थानिक तलाठ्यांना एका खबऱ्याने फोनद्वारे माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याने वाळू तस्करांना पाठीशी घातल्याची चर्चा गावभर रंगू लागली आहे. जर तलाठ्यांना त्याच रात्री थोडीशी तसदी घेतली असती तर आज चोराला सोडून संन्याशाला फाशी झाली नसती. तो वाळू तस्कर मात्र मोकाट आणि ज्याचे बांधकाम चालू आहे त्यालाच आता फासावर लटकवणार असल्याचे काही चित्र दिसू लागले आहे.