मुंबई : राज्य सरकारने सुपरमार्केट तसेच ‘वॉक इन स्टोअर’मध्ये वाईनविक्रीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर विरोधकांनी विरोध करण्यास सुरु केले आहे. भाजपाने या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. आता भाजपनेते अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताना वादग्रस्त विधान केलं आहे.
आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. हाच धागा पकडून अनिल बोंडे यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. वाईन म्हणजे दारु नाही, असा युक्तीवाद राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करत आहे. तसं असेल तर मग संत्र्याच्या रसाऐवजी वाईन घेऊनच महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे विक्री करावी, असं विधान अनिल बोंडे यांनी केलं आहे.
अनिल बोंडे पुढं म्हणाले की, 30 जानेवारी रोजी नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळ्या घालून हत्या केली. मात्र महाविकास आघाडी सरकार रोज महात्मा गांधी यांची हत्या करत आहे. चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी गावात दारूबंदी करा, असं गांधींनी सांगितलं. त्याच महात्मा गांधींचा वारसा सांगणारे महाविकासआघाडी सरकारचे किराणा दुकान आणि मॉलमध्ये दारू विकण्याचे आदेश देतायत. हे दुर्दैवी असल्याचं त्यांनी नमूद केलं.
दरम्यान अजित पवार म्हणतात वाईन म्हणजे दारू नसून फळाचा रस आहे. मग संत्र्याच्या रसाऐवजी वाईन घेऊनच महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापुढे विक्री करावी असं वादग्रस्त विधान बोंडे यांनी केलं.