मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुरुष खेळाडूंसाठी जशी इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) सुरू केली, त्याच धर्तिवर महिला क्रिकेटपटूंसाठीही सुरू करावी अशी विनंती भारताच्या महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने केली आहे.
चीनसह जगभरात पसरत असलेल्या करोना विषाणूंचा धोका वाढत असल्याने मंडळाने यंदा येत्या रविवारपासून सुरू होणारी आयपीएल पुढे ढकली होती. आता तर देशभरात लॉकडाऊन असल्याने ही स्पर्धा बदललेल्या वेळापत्रकानुसार 15 एप्रिलपासूनही सुरू होण्याची शक्यताही संपुष्टात आली आहे. असे असले तरीही ही स्पर्धा यंदा झालीच नाही तरी पुढील वर्षी होऊ शकते, त्यामुळे जेव्हा ही स्पर्धा घेण्यात येईल त्यावेळी महिलांची स्पर्धा देखील सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी मितालीने केली आहे.
सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. करोनावर नियंत्रण आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. यामुळे यंदा आयपीएल होण्याची थोडीफार शक्यताही संपलेली आहे.
मंडळाने पुढील वर्षापासून महिलांसाठी आयपीएल सुरू करावी. ती मिनी स्वरूपात असली तरी हरकत नाही. या स्पर्धेची लोकप्रियता पाहून त्यात भविष्यात बदलही करता येतील. त्याचे नियम व आराखडा कसा असावा हे मंडळाची क्रिकेट समिती ठरवेलच मात्र, आता महिलांसाठीही ही स्पर्धा असावी असे मला वाटते. जसे पुरुष क्रिकेटपटूंच्या स्पर्धेतून भारतीय संघाला गुणवान खेळाडू गवसले तसेच महिला संघालाही मिळतील असा मला विश्वास आहे. असे खेळाडू मिळाले तर भविष्यात जागतिक क्रिकेटमध्ये भारतीय संघाला वर्चस्व निर्माण करणे शक्य होईल, असेही मितालीने स्पष्ट केले.
यंदा ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भारताच्या महिला संघाला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे संघाचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न भंगले होते. त्यावेळी संघात प्रत्येक खेळाडूसाठी पर्याय असणे महत्त्वाचे आहे व त्यासाठी तळागाळापर्यंत महिला क्रिकेटचा प्रसार होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी व्यक्त केले होते. हाच धागा पकडून मितालीने ही विनंती केली आहे.
गतवर्षी मंडळाने महिलांच्या आयपीएलचे काही सामने प्रायोगिक तत्वावर खेळवले होते. तसेच या वर्षी मंडळाकडून महिलांच्या संघाची चौरंगी मालिका खेळविण्याचे मंडळाने जाहीरही केले होते. मात्र, करोनामुळे आता ही स्पर्धा रद्द होण्याचेच संकेत मिळत आहेत. करोनाचा धोका संपुष्टात आला व मंडळाने त्यावेळी आगामी मोसमाचे वेळापत्रक जाहीर केले तर त्यात महिलांसाठी आयपीएल असावी असेही मला वाटते, असे मितालीने व्यक्त केले आहे.