मुंबई : राज्यात रानमळा वृक्षलागवडीचा पॅटर्न नगर विकास आणि ग्रामविकास विभागामार्फत “वृक्षाची जोपासना हीच निसर्गाची उपासना” या नावाने राबविला जातो. याअंतर्गत मानवी जीवनातील विविध घटना-प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्यात येतात. ३३ कोटी वृक्षलागवडीत यावर्षी अशी ३ लाख ४८ हजार ८८७ “आठवणींची झाडं” लागणार आहेत.
आठवणीची रोपटी जेव्हा वृक्ष होऊन डोलतात तेव्हा हा स्मृतीगंध अधिकच गहिरा होत जातो, आयुष्यभर दरवळत राहतो. यातून हरित आणि समृद्ध महाराष्ट्राची वाटचाल सोपी आणि वेगवान होण्यास मदत होते हीच भावना लक्षात घेऊन वन विभागाने “वृक्षाची उपासना हीच निसर्गाची उपासना” हा उपक्रम राबविला असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात.
गावात जन्माला येणाऱ्या बालकाचे स्वागत त्याच्या कुटुंबियांनी रोपटं लावून केले. तर, बाळ जसजसे वाढेल तसतसे ते झाडही वाढत जाईल. गावात होणाऱ्या विवाहाप्रसंगी “शुभमंगल” वृक्ष लावला तर नवदाम्पत्याच्या नव्या आयुष्यासाठी सुरक्षित पर्यावरण मिळेल. दहावी-बारावी पास होणारे, नोकरी मिळाली म्हणून आनंद व्यक्त करणारे लोक “आनंद वृक्ष” लावून आपला आनंद द्विगुणित करतील.
लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीच्या हातानं अंगणात “माहेरची झाडी” लावून घेतली तर तिच्या अस्तित्वाचा आणि आठवणींचा मोहोर घरभर दरवळत राहील, ती सासरी सुखी असल्याचा सांगावा ही तिच्या नावाने लावलेली माहेरची झाडी सांगत राहील. दुर्देवाने घरातलं जीवाभावाचं माणूस हरवलं तर त्याच्या नावाने लावलेला “स्मृती” वृक्ष त्याची आठवण जोपासत राहील. थोडक्यात आठवण सुखाची असो की दु:खाची ती वृक्षलागवडीच्या माध्यमातून चैतन्यमयी स्वरूपात जीवंत ठेवण्याचं काम या योजनेतून होईल शिवाय यातून उत्पन्नवृद्धी होईल ते वेगळं, असेही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.