मुंबई – शेअर बाजार निर्देशांक आवश्यकतेपेक्षा जास्त पातळीवर असल्याची भावना बऱ्याच गुंतवणूकदारांच्या मनात रेंगाळत आहे. त्याचबरोबर या आठवड्यात मासिक डेरिव्हेटिव एक्सपायरी असल्यामुळेही शेअर बाजाराचे निर्देशांक अस्थिर राहिले.
शेअर बाजारातील आजच्या कामकाजाचे वैशिष्टय म्हणजे रिलायन्स कंपनीचा शेअर साडेपाच टक्क्यांनी कोसळला. या कंपनीचे बाजारमूल्य 20 टक्के फुगलेले आहे असे समजले जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजबरोबरच इंडसइंड बॅंक, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, पावर ग्रिड या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.
विक्रीचा जोर इतका होता की सेन्सेक्स संबंधातील 30 पैकी 21 कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. ऍक्सिस बॅंक, सनफार्मा, बजाज ऑटो, बजाज फिन्सर्व, एचडीएफसी बॅंक, डॉक्टर रेड्डीज या कंपन्यांच्या शेअरची थोडीफार खरेदी झाली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 530 अंकांनी म्हणजे 1.09 टक्क्यांनी कमी होऊन 48,347 अंकांवर बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स 50,000 अंकापर्यंत वाढला होता. मात्र आता गुंतवणूकदार जोखीम कमी करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 133 अंकानी कमी होऊन 14,238 अंकावर बंद झाला.
सलग तिसऱ्या दिवसाची झालेल्या विक्रीबाबत विश्लेषकांनी सांगितले की, या आठवड्यात कामकाजाचे कमी दिवस आहेत. त्याचबरोबर पुढील आठवड्यात अर्थसंकल्प सादर होणार आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार अस्थिर मानसिकतेत आहेत. मंगळवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शेअर बाजाराचे कामकाज होणार नाही. चलन बाजारात आज रुपयाचे मूल्य तीन पैश्यांनी तर क्रुडचे दर अर्धा टक्क्यानी उच्च पातळीवर राहिले.