मुंबई – मी माझ्या माणदेशी भाषेतील मित्राशी संवाद करतानाचे वाक्य (काय झाडी… काय डोंगर… काय हाॅटेल) सगळ्या जगभर प्रसिद्ध झाले. त्यावर संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी टीका केली. संजय राऊत हे कुजके शरीर, कुजकी बुद्धी आणि कुजक्या मनाचा माणूस आहे. ते काय बोलतात याला कोणी किंमत देत नाही. आदित्य वयाने लहान असून संजय राऊत जे शिकवतात तेच ते बोलतात पण उद्धव साहेबांनी केलेली टीका अत्यंत चुकीची होती, असे शहाजीबापू यांनी सांगितले. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, यावेळी मुलाखतीत शहाजीबापू यांनी सत्ताबदलापूर्वीच्या अनेक घटनांवर प्रकाश टाकला. मुंबई येथून आमदारांनी बाहेर पडायचे ठरवले तेव्हा शरद पवार , दिलीप वळसे पाटील, उद्धव ठाकरे आणि त्यांचा गोतावळा हे सर्व मुंबईत असताना एकनाथ शिंदे यांनी कोणाच्या कानाला खबर न लागू देता हे मिशन यशस्वी पणे राबवले. अगदी सगळ्यांना चारीमुंड्या चित करायची ताकद असणाऱ्या एकनाथ शिंदे याना आम्ही जेम्स बॉण्ड म्हणतो अशी मिश्किल टिपण्णी केली. मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते पण आमच्या आग्रहामुळं त्यांनी हे पाऊल उचललं असंही शहाजी बापूंनी सांगितले.
काही बंडखोर आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच सत्ता बदल होईल अशा वावड्या उठवणाऱ्या संजय राऊत यांनी हे लक्षात ठेवावे कि, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 50 आमदारांच्या पैकी एकही आमदार आयुष्यात कधीही पुन्हा त्यांच्या हाताला लागणार नाही, असा टोलाही शहाजीबापू पाटील यांनी लगावला.