मुंबई – जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. उद्या पक्षाचे काम कसे चालणार, यासाठी निर्णय घेतला आहे. आम्ही जोपर्यंत भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे आहोत, पक्ष शक्तिशालीपणे उभा करावा, हा त्याचा हेतू होता. येत्या काही दिवसांत मी अंतिम निर्णय घेईन आणि कार्यकर्त्यांच्या भावनांकडे दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी मंगळवारी पक्षाच्या अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे. पवारांनी अध्यक्षपद सोडू नये, यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे. मात्र, पवारांनी आपल्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी 2 ते 3 दिवसांचा काळ मागितला असला तरीही ते अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले जाते. दरम्यान, आज देखील शरद पवारांनी सकाळी वायबी चव्हाण सेंटरमध्ये उपस्थिती लावली होती. त्यानंतर सेंटरमधून बाहेर आल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले, तुमच्या भावनांचा मी आदर करतो. असे निर्णय घेताना सहकाऱ्यांशी चर्चा करणे आवश्यक असते. परंतु मला खात्री होती की, मी चर्चा केली असता तर तुम्ही विरोध केला असता. तुम्हाला विश्वासात घेऊन मला निर्णय घेण्याची आवश्यकता होती. मात्र, ती घेतली गेली नाही. त्यामागील हेतू काय होता, हे देखील मी तुम्हाला सांगितला.
हा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा अनेक तुमचे सहकारी मित्र याठिकाणी आलेत. माझ्याशी त्यांना काहीतरी बोलायचे आहे. त्यामुळे उद्या संध्याकाळपर्यंत त्यांच्यासोबत माझी बैठक होईल. ती बैठक पार पडल्यानंतर जी काही तुमची भावना आहे ती विश्वासात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येईल. तुमच्या भावनांचा आदर करून 1 ते 2 दिवसांत निर्णय घेणार, असे त्यांनी सांगितले.