मुंबई – अंसतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेनेचे नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी “लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीत व्यक्त केले आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीतून पवारांनी उद्धव ठाकरे नेमके कुठे कमी पडले तसेच अन्य महत्त्वाच्या अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
मंगळवारी सकाळी 11 वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात “लोक माझे सांगाती’चा प्रकाशनाचा सोहळा पार पडला. लोक माझे सांगातीच्या दुसऱ्या आवृत्तीत 70 पानांची जोड आहे. या आवृत्तीत 2019 नंतर राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेनेची युती कशी तुटली? आणि महाविकास आघाडीची निर्मिती कशी झाली?, यावर शरद पवारांनी सुधारित आवृत्तीत लिखाण केले आहे.
या पुस्तकात शरद पवार पुढे म्हणतात, महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात ठाकरे यांनी माघार घेतली. शारीरिक अस्वास्थ्य हे त्यामागचे कारण असावे. करोनाच्या काळात राष्ट्रवादीचे सारे मंत्री मैदानात सक्रिय होते. उद्धव ठाकरे हे प्रशासनाच्या संपर्कात होते, पण दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून. महाविकास आघाडीचे सरकार हे भाजपला देशभरात मिळालेले सर्वात मोठे आव्हान होते. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार याची कल्पना होती.
आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेतच वादळ माजेल याचा अंदाज आला नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेनेचे नेतृत्व कमी पडले. संघर्ष न करता उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने महाविकास आघाडीच्या सत्तेला विराम मिळाला.
पहाटेच्या शपथविधीवर भाष्य
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवर शरद पवार यांनी प्रथमच सविस्तर भाष्य केले आहे. या आपल्या राजकीय आत्मचरित्रात अजितने उचललेले पाऊल अत्यंत गैर होते, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच, माझ्या संमतीनेच हे घडत असल्याची समजूत अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना करून देण्यात आली होती, असेही शरद पवारांनी सांगितले आहे.
मोदींना भेटून युतीसाठी स्पष्ट नकार दिला
सुधारित आत्मचरित्रात पवारांनी हे देखील कबूल केले की महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेबाबत अनिश्चितता असताना राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली होती. “राष्ट्रवादीसोबत युती होण्याची शक्यता आहे का, याचा शोध भाजपने सुरू केला, पण या प्रक्रियेत माझा सहभाग नव्हता. ही केवळ भाजपची इच्छा होती आणि भाजपशी कोणतीही औपचारिक चर्चा झाली नाही. पण दोन्ही पक्षांतील निवडक नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली,’ असे पवारांनी लिहिले. परंतू राष्ट्रवादीला फारसे स्वारस्य नसल्याने मी दिल्लीत मोदींना भेटल्यानंतर त्यांना आपल्यात युती होऊ शकत नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. हा हेही खरे आहे की त्यावेळी पक्षातील एका गटाला भाजपसोबत जाण्याची इच्छा होती, असेही पवारांनी लिहले आहे.
राजकीय चातुर्य आवश्यक
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत शरद पवार यांनी आपल्या पुस्तकात थेट उल्लेख केला आहे. एका भागात शरद पवार म्हणतात, राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. त्यावर बारीक लक्ष ठेवावे लागते. उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याबाबतीत आम्हाला सर्वांनाच कमतरता जाणवत होती. उद्धव ठाकरे यांना अनुभव नसल्याने हे घडले असले तरी ते टाळता आले असते.
उद्धव यांचे आजारपण वाढले
शरद पवार एके ठिकाणी म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. त्या चर्चेत सहजपणा असायचा. पण, त्या सहजपणाची उणीव उद्धव यांच्याशी बोलताना जाणवली. सरकार स्थापन झाल्यानंतर काही काळानंतर उद्धव यांचे आजारपण वाढले. त्यांच्या (उद्धव) प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. डॉक्टरांच्या वेळापत्रकानुसार त्यांना काम करावे लागत होते, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.