मुंबई : रवींद्र जडेजा व हर्षा भोगले यांच्यावर उघडपणे टीका केल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडऴाच्या समालोचकांच्या पथकातून तसेच सौरव गांगुलीच्या गुडबूकमधून बाहेर गेल्यावर संजय मांजरेकर यांना उशिरा शहाणपण सुचले आहे.पाण्यात राहून माशाशी केलेले वैर चांगलेच महागात पडल्यानंतर आता मांजरेकर यांनी भारतीय संघातील खेळाडूंचे गुणगान सुरू केले आहे.
भारतीय संघाच्या फलंदाजी क्षमतेचा आढावा घेतला तर लोकेश राहुल याला पाचव्या क्रमांकावर खेळवावे, असे मत मांजरेकर यांनी मांडले आहे. एकदिवसीय क्रिकेटचा विचार केला तर सध्या संघाला युवराजसिंगसारख्या फलंदाजाची नितांत गरज आहे. मात्र, आता तो निवृत्त झाला आहे अशा स्थितीत सुरेश रैना चौथ्या क्रमांकावर उपयुक्त ठरू शकतो.
राहुलने गेल्या मोसमापासून आपले सातत्य सिद्ध केले आहे. तसेच यष्टीरक्षणाची जबाबदारीही समर्थपणे पेलली आहे.
त्यामुळे राहुलचा दुहेरी उपयोग करून घेता येत आहे. त्याची फलंदाजीही सरस होत आहे आणि पाचव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार याचे उत्तर आज तरी राहुल असेच द्यावे लागेल, असेही संजय मांजरेकर म्हणाले.