संगमनेर, (प्रतिनिधी) – तालुक्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडट होवून झालेल्या वादळी पावसात पठार भागातील वरुडी पठार येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. बुधवारी सांयकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. सुनील गणपत फटांगरे (वय 45) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
संगमनेर तालुक्यातील पठार भागातील वरुडी पठार येथील शेतकरी सुनील फटांगरे बुधवारी आपल्या शेतातील हरभरा पिकाची काढणी करत होते. शेतात काम करत असताना सांयकाळी सहाच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले. काही क्षणात त्याच्या अंगावर वीज पडल्याने फटांगरे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पावसाने अनेक घरांची पडझड झाली असून गुंजाळवाडी पठार येथील दोन जनावरे वीज पडून मरण पावली आहेत. अनेक भागातील शेतकऱ्यांचे या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकीकडे करोनाने थैमान घातले असून दुसरीकडे झालेल्या पावसाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.