कोल्हापूर – शेतकऱ्यांना खलिस्तानवादी म्हणणारे अमित शहा कोण लागून गेले? येत्या दोन दिवसांत दिल्लीतील शेतकऱ्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय न घेतल्यास केंद्रीय मंत्र्यांना राज्यात फिरून येणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात बोलत होते. राजू शेट्टी यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक होऊन मोठी झटापट उडाली.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी विधेयक आणून शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. ही विधेयके मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी दिल्लीत धडक दिली आहे. मात्र या मागण्याचा विचार न करता केंद्र सरकारने त्यांच्यावर बळाचा वापर करून आंदोलन चिघळविण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
अन्य शेतकरी जखमी झाले आहे. त्याच्या निषेधार्थ व शेतकऱ्यांचा समर्थनार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आंदोलनकर्त्याना पोलिसांनी अडवले. यावेळी मोठी झटापट उडाली. मात्र याला न जुमानता केंद्र सरकारच्या प्रतिमेचे दहन केले.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ‘जात’ आणि ‘प्रांतवाद’ देण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन केवळ पंजाब व उत्तर भारतातील शेतकऱ्यांपुरते मर्यादित नाही. तर हे आंदोलन संपूर्ण देशातील शेतकऱ्यांशी निगडित आहे. न्याय मागणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात भूमिका घेणे हे कितपत योग्य आहे, असा सवाल शेट्टी यांनी केला.
तुम्ही जातीवादाचा मुद्दा बाहेर काढत असाल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. पोलिसांचा दबाव टाकून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर याद राखा आमची हयात पोलिसांच्या विरोधात लढण्यासाठी गेल्याचेही यावेळी राजू शेट्टी म्हणाले.