पुणे – जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील आंबळे गावात मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. 25 वर्षीय तरूणाने आपल्या सावत्र भाऊ आणि वहिनीवर हल्ला केला असून या हल्ल्यात भाऊ गंभीर जखमी झाला आहे तर वहिनीचा मृत्यू झाला आहे.
तसेच हल्ला केल्यानंतर दुचाकीवरून पळून जाताना खुन करणाऱ्या तरूणाचाही अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रियंका सुनील बेंद्रे (वय 28) असे खुन झालेल्या महिलेचे नाव असून अनिल बाळासाहेब बेंद्रे (वय 25) असे खुन करून पळून जाताना मृत्यू पावलेल्या तरूणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, प्रियंका बेंद्रे आणि पती सुनील बेंद्रे (वय 30) हे दाम्पत्य पुण्यातील एका आयटी कंपन्यांमध्ये नोकरीला होते. सुनीलचा लहान सावत्र भाऊ अनिल बेंद्रे हा सुद्धा ग्रॅज्युएट होता आणि पुण्यातील कंपन्यांमध्ये नोकरी करत होता. पण अनिल व्यसनाधिन असल्यामुळे तो कोणत्याच कंपनीत टीकत नव्हता. त्याच्या गैरवर्तनुकीमुळे त्याला कामावरून काढून टाकले जात असे. त्यामुळे वडील बाळासाहेब बेंद्रे यांनी त्याला मूळगावी आंबळे येथे घेऊन आले.
पुण्यावरून गावी आणल्यामुळे अनिल नाराज होता. त्याला शेती करण्यास रस न्हवता. मात्र जबरदस्तीने वडीलांनी आणल्यामुळे तो तणावात होता. त्याचे कुटुंबियांसोबत सतत भांडणे व्हायची. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच प्रियंका आणि सुनिल हे देखील गावी आले होते. त्यांना नोकरीसाठी परदेशात जायचे होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिलने रविवारी (दि. 23 ) खोलीत स्वत:ला कोंडून घेऊन घरातील काच, टेबलाची तोडफोड केली. काही वेळाने त्याला खोलीबाहेर काढून त्याची समजूत काढण्यात आली. मात्र मंगळवारी (दि. 25) पहाटे साडेचार वाजता सुनिल आणि त्याची पत्नी प्रियंका टेरेसवर झोपले अनिलने विटा, डंबेल, चाकूने भावजयी आणि भावावर हल्ला केला. हल्ला करून तो तेथून दुचाकीवरून पळून जात होता.
तो चौफुला गावाच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर आला असता त्याची दुचाकीची स्विफ्ट कार जोरदार धडक बसली. तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पुणे शहरातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच त्याने केलेल्या हल्ल्यात प्रियंका यांचा मृत्यू झाला असून अनिल गंभीर जखमी झाले आहेत. निराशा आणि वैफल्यातून अनिलने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.