म्हैसूर – हे दशक भारताचे दशक म्हणून ओळखले जावे, यासाठी देशाच्या विकासासाठी केंद्र सरकार चौफेर प्रयत्न करीत असून त्यासाठीच देशाच्या सर्वच क्षेत्रात मोठे फेरबदल केले जात आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. भारत हा उच्च शिक्षणासाठी जागतिक हब व्हावा, यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
म्हैसूर विद्यापीठाच्या शताब्दी पदवीप्रदान समारंभात ते व्हिडिओ कॉन्फसिंगद्वारे बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या सहा ते सात महिन्यांत केंद्र सरकारने कृषी, अंतरिक्ष, संरक्षण, विमान वाहतूक क्षेत्र, कामगार क्षेत्र या क्षेत्रात मोठे फेरबदल केले आहेत. विकासाला चालना देण्यासाठीच हे बदल केले जात आहेत, असे ते म्हणाले.
आर्थिक क्षेत्रातील या फार मोठ्या सुधारणा असून इतक्या झपाट्याने या देशात यापूर्वी कधीच अशा सुधारणा झाल्या नव्हत्या असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचेही जोरदार समर्थन केले. सरकारने नव्यानेच जे शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे त्या संबंधात बोलताना ते म्हणाले की, युवकांसाठी आधिक स्पर्धात्मक वातावरण तयार करणे, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संधी त्यांना निर्माण करून देण्याच्या उद्देशानेच हे धोरण तयार करण्यात आल्याचा दावाही पंतप्रधानांनी यावेळी केला.
देशाच्या विविध भागांत सध्या आलेल्या पुराचा उल्लेख करून पंतप्रधानांनी या आपत्तीत ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या विषयी सहानुभूती व्यक्त केली.