पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय सनसनाटी निर्माण झाल्यानंतर त्यांच्या पक्षाला (जेडीयू) सारवासारव करावी लागत आहे. नितीश यांच्या मनात राजकीय संन्यासाचा विचार नसल्याचे सांगताना जेडीयूची दमछाक होत आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा प्रचार गुरूवारी समाप्त झाला. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी एका सभेत बोलताना नितीश यांनी ही माझी शेवटचीच निवडणूक असल्याचे म्हटले. त्यामुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले. संभाव्य पराभवाची जाणीव झाल्याने नितीश राजकारणातून बाहेर पडण्याची भाषा बोलत आहेत, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया विरोधकांकडून देण्यात आल्या.
अजून एका टप्प्यासाठीचे मतदान शिल्लक असल्याने नितीश यांच्या वक्तव्याचा प्रतिकूल परिणाम जेडीयूवर होऊ शकतो, अशी धास्ती वाटू लागल्याने त्या पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून नितीश राजकीय संन्यास घेणार नसल्याचे ठसवण्यासाठी जेडीयूला आटापीटा करावा लागत आहे.
त्यादृष्टीने जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांची प्रतिक्रिया प्रातिनिधिक मानावी लागेल. नितीश यांचे पूर्ण वक्तव्य विचारात घेतले गेले नाही. नितीश सध्याच्या निवडणुकीतील शेवटच्या प्रचारसभेत बोलत होते. त्याचा संदर्भ त्यांना द्यायचा होता.
राजकीय किंवा सामाजिक जीवनात सक्रिय असणारा कुणी निवृत्त झाला आहे का, असा सवाल सिंह यांनी प्रतिक्रियेदाखल पत्रकारांशी बोलताना विचारला. जेडीयूचे बिहारमधील मंत्री संजयकुमार झा यांनीही सिंह यांच्याप्रमाणेच भूमिका मांडली.
प्रत्येक निवडणुकीत नितीश अखेरच्या सभेचा उल्लेख करतात. जनतेची इच्छा असेपर्यंत ते बिहारची सेवा करतील, असे ते म्हणाले. दुसरीकडे, मतदारांना भावनिक साद घालण्याच्या उद्देशातून नितीश यांनी शेवटची निवडणूक असा शब्दप्रपंच केल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटत आहे.