सोलापूर – राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत अजित पवार आणि काही ज्येष्ठ मंडळींनी शिंदे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेऊन मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद आता सोलापूर शहर आणि जिल्ह्यात उमटायला सुरुवात झाली आहेत. शहरातील जेष्ठ मंडळी वगळता बहुतांश तरुण नेते आणि कार्यकर्ते हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुद्धा अजित पवार यांनाच अधिक पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहेत.
एकेकाळी राष्ट्रवादीची ताकद असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आता राष्ट्रवादी अखेरच्या घटका मोजू लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात एका सहयोगी अपक्षसह राष्ट्रवादीचे तीन आमदार आहेत. या तीनही आमदारांनी शरद पवार यांना सोडून अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात शरद पवारांची उरलीसुरली राष्ट्रवादीसुद्धा शिल्लक राहते की नाही ? अशी भीती राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून सोलापूर जिल्ह्यात ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते – पाटील हे शरद पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. ज्यामध्ये स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक, करमाळ्याची बागल मंडळी तसेच बार्शीचे माजी मंत्री दिलीप सोपल यांचा समावेश होता.
त्यानंतर मात्र अजित पवार यांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे मोहिते पाटलांनी शरद पवारांची साथ सोडली आणि ते भाजपला जाऊन मिळाले. त्यांच्यासोबत पंढरपूरच्या परिचारक परिवाराने देखील भारतीय जनता पार्टीचा रस्ता धरला. बार्शीचे माजी मंत्री दिलीप सोपल आणि करमाळ्याच्या माजी आमदार रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मात्र माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे, आमदार यशवंत माने, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील – नगरकर, सांगोल्याचे विधानपरिषदेचे माजी आमदार दीपक साळुंखे तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे ही निवडक मंडळीच आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सांभाळत होती. परंतु आता शिंदे बंधूसह मोहोळचे आमदार यशवंत माने तसेच अन्य नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे सोलापूरच्या ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उतरती कळा लागली आहे.
माजी आमदार राजन पाटील यांची पक्षात घुसमट होत असल्यामुळे ते भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याच्या चर्चेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात वादळ उठले आहे. सांगोल्यात दीपक साळुंखे – पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी आपली मैत्री टिकवून ठेवली आहे. करमाळ्यात अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आमदार संजय शिंदे हे अपक्ष म्हणून काम पाहतात. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांचे वर्चस्व कायमच आहे. मोहिते – पाटील आणि माढ्याचे शिंदे बंधू यांच्यात मोठे राजकीय वैमनस्य आहे. हे जगजाहीर आहे.
इतकेच नव्हे तर मंत्री तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचेसुद्धा आमदार शिंदे बंधू यांच्या सोबतचे वैर सर्वश्रुत आहे. सोलापूरच्या ग्रामीण भागातील ही राजकीय गुंतागुंत झालेली असतानाच आता राज्यात नव्याने सत्तेची समीकरणे झाल्यामुळे मोहिते – पाटील, सावंत आणि आमदार शिंदे बंधू हे एकमेकांशी कसे जुळवून घेतात, याकडे सोलापूर वासियांचे लक्ष लागले आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यामुळे शहराच्या ग्रामीण भागातील राजकारणाची गणिते पुरती बदलून गेली आहेत. एकमेकाला पाण्यात पाहणारे आता एकमेकांसोबत किती काळ राहतात ? हे पाहणेसुद्धा औत्सुक्याचे बनले आहेत.
बार्शीचे माजी मंत्री दिलीप सोपल हे आपले कट्टर प्रतिस्पर्धी असलेले भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी जुळवून घेणार का? करमाळ्यात एकमेकांच्या विरोधात लढायला उतरणारे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील आणि रश्मी बागल तसेच अजित दादा पवार यांचे निकटवर्ती असलेले करमाळ्याचे अपक्ष आमदार संजय शिंदे या तिघांमध्ये सख्य राहणार का? हा सुद्धा सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा ठरणार आहे .