नांदेड :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती येत्या १४ एप्रिल रोजी घराबाहेर न पडता आपआपल्या घरीच राहून ती साजरी करु या. कोरोनाशी एकजूटीने लढा देण्यासाठी जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संघटना, प्रमुख नेत्यांचे सहकार्य रहावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित आढावा बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर म्हणाले, जिल्ह्यात अन्नापासून कोणालाही वंचित ठेवणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाचे पूर्ण प्रयत्न आहेत. इतर राज्यातील, स्थलांतरीत व्यक्तींना दररोज सकाळचा नास्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण देण्यात येत आहे. जनधन योजनेच्या बँक खात्यातील रक्कम काढण्यासाठी नागरिकांनी बँकेत गर्दी करु नये. गरज नसेल व खर्च चालू शकतो त्यांनी रक्कम काढण्यासाठी जाऊ नये. आपली रक्कम बँकेतच जमा राहणार असून ती रक्कम वापस जाणार नाही. जनतेनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.