मुंबई – मुंबईतील लोकल प्रवास सेवा करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस झालेल्यांना 15 ऑगस्टपासून सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. त्याचवेळी राज्याच्या अन्य भागातही रेस्टॉरंट आणि मॉल्स सुरू करण्याचा निर्णय येत्या आठ दिवसांत घेतला जाईल. त्यासाठी करोना टास्क फोर्ससोबत उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी करोनाचे निर्बंध, परिस्थिती, राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती आणि आरक्षणाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. मंदिरे, दुकाने, रेस्टॉरंट बंद असल्याने नागरिकांचा संयम संपत चालालेला आहे. मात्र, असा संयम सोडू नका. लसीकरण ठराविक टप्प्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला काही गोष्टी पाळाव्या लागतील असा संयमाचा डोसही ठाकरे यांनी दिला.
ठाकरे म्हणाले, पुणे जिल्हा, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा सिंधूदूर्ग, रत्नागिरी आणि बीड जिल्ह्यात अद्याप काळजी घेण्याची गरज आहे. कोविडच्या संकटामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्वाजनिक ठिकाणी वावारताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. हे उघडा ते उघडा करत आंदोलन करणाऱ्यांना जनतेने थारा दिला नाही. त्यामुळेच दुसरी लाट आटोक्यात येत आहे. त्याचे श्रेय संपूर्णत: राज्यातील जनतेचे आहे, असे ते म्हणाले.
ज्या व्यावसायिक अस्थापनांना 24 तास ऑफिस सुरू ठेवणे शक्य आहे त्यांनी ती ठेवावीात. म्हणजे कामाच्या वेळेचे विभाजन करता येईल, असे सांगून ठाकरे म्हणाले, ज्या कारखान्यांकडे जागा असेल, त्यांनी तेथे अथवा जवळपासच्या भागात कामगारांच्या निवासाची राज्य सरकारच्या सहकार्यांने निवासाची सोय करावी. महणजे जर तिसरी लाट आलीच तर आपले अर्थचक्राचे गाडे नियमित सुरू राहील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आरक्षणाची 50 टक्क्याची अट शिथिल करा
मी, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन आरक्षणाचा अधिकार राज्यांना देण्याची मागणी केली होती. तशी त्यांनी कार्यवही संसदेच्या अधिवेशनात केली. मात्र, नुसते हे अधिकार देऊन काही लाभ होणार नाही, त्यासाठी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करणे आवश्यक आहे. पंतप्रधान ही मागणी मान्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.