सोलापूर – करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात 31 मेपर्यंत लाॅकडाऊन आहे. लाॅकडाऊनमुळे सर्वांचेच खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 1 जुननंतर लाॅकडाऊन वाढवले तर सर्वांना आणखीनच कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. त्यामुळे लाॅकडाऊन वाढेल की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशातच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला तर एक जुननंतर लाॅकडाऊन काढण्याचा विचार मंत्रीमंडळाकडून केला जात आहे, अशी माहिती राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. सोलापूरात करोना स्थितीबाबतच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
मागील काही दिवसांपासून राज्यात आणि जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र समोर येत आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीमही सर्व स्तरापर्यंत जाऊन करून घेतली जात आहे. याशिवाय तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव रोखण्याकरता प्रयत्न केले जात आहेत.
या सर्व गोष्टीचा विचार करून पुढील काळामध्ये राज्यात आणि जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला तर एक जूननंतर लॉकडाऊन शिथील करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाकडून घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही 1 जुननंतर लाॅकडाऊन शिथील करण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. सध्या राज्यातील करोना संसर्ग नियंत्रणात असून पुढील दिवसातील स्थिती पाहूनच लॉकडाउन वाढवायचा की नाही ते ठरवावं लागेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.