लखनौ – भारतीय जनता पक्षाकडून उत्तरप्रदेशात जयंत चौधरी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकदल पक्षाला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
या संबंधात उत्तरप्रदेशचे एक मंत्री कपिलदेव अग्रवाल यांनी म्हटले आहे की, 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकदलाची भाजपसोबतची युती जयंत चौधरी यांच्या पक्षासाठी “सर्वात फायदेशीर” ठरली होती कारण त्यांनी त्यावेळी पाच जागा जिंकल्या होत्या. आरएलडीचे मतदार आज भाजपकडे आकर्षित झाल्याचा दावाही त्यांनी केला.राष्ट्रीय लोकदल हा पक्ष सध्या विरोधकांच्या इंडिया आघाडीकडे आहे.
पुढच्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत युती करायची की नाही, हे भाजपचे नेतृत्व आणि आरएलडीचे प्रमुख चौधरी ठरवतील, असे ते म्हणाले.हे माझे काम नाही. तथापि, मी निश्चितपणे म्हणेन की आज आरएलडीचे मतदार भाजपकडे आकर्षित झाले आहेत,असे अग्रवाल म्हणाले. आम्हीं जयंत चौधरी यांना सन्मानच दिला आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.
सध्या, राष्ट्रीय लोकदल हा पक्ष समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष आहे आणि त्यांनी 2022 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सपासोबत लढल्या होत्या. उत्तर प्रदेश विधानसभेत आरएलडीचे नऊ आमदार आहेत.
उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्ष काळानुसार कमजोर झाला असून त्यांचे मतदार आता भाजपबरोबर आहेत असा दावाही त्यांनी केला. उत्तरप्रदेशात भाजपच्या राजवटीत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चांगलीच सुधारली आहे असा दावाही त्यांनी केला.